लेखी आश्वासन मिळाल्याने राष्ट्र सेवा दलाचा मोर्चा स्थगित
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
गुळसुंदे ग्रामपंचायतीमधील ३ महसुली गावांसह ४ आदिवासी वाड्यांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार असून येथील लाडीवली, आकुलवाडी, गुळसुंदे, चिंचेचीवाडी, स्टेशन वाडी, डोंगरीची वाडी,फलाटवाडी या गावांसाठी जल जीवन मिशन योजनेमधून नवीन योजना कार्यान्वित करून एम.आय.डी. सी. चे पाणी घेऊन पुढील चार महिन्यात ही योजना पूर्ण करण्याचे रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून लेखी आश्वासन राष्ट्र सेवा दलाचे जिल्हा संघटक संतोष ठाकूर यांना देण्यात आले असल्याने सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या लाडीवलीतील महिलांसह राष्ट्र सेवा दलाच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.
गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील लाडीवली आकुलवाडी, गुळसुंदे या गावांसह डोंगरीची वाडी, स्टेशनवाडी,फलाटवाडी, चिंचेचीवाडी ह्या आदिवासी वाड्यांतील नागरिकांना मागील १० ते १२ वर्षांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या सुमारे ५२ वर्ष जुन्या व नादुरुस्त चावणे पाणीपुरवठा प्रकल्पाद्वारे पाताळगंगा नदीतील दूषित पाणी कोणत्याही जलशुद्धीकरण प्रक्रियेवीणा पुरवठा केला जातो तोही आठवड्यातून एक ते दोनवेळा याबाबत संबंधित पाणी पुरवठा योजनेचे उपअभियंता, कार्यकारी अभियंता, पनवेल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे वारंवार तोंडी, लेखी तक्रारी करून प्रसंगी मोर्चे काढूनही नागरिकांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा होत नव्हता याची गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीतही दिसून आले होते.टाकीतील अशुद्ध पाण्यामुळे होणारे आजारांनी ग्रामस्थ त्रस्त आहेत.
या समस्येने गुळसुंदे ग्रामपंचायतही हतबल झाली म्हणून रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, रायगडच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांनाही पत्रव्यवहार करूनही मार्ग निघत नव्हता. अखेर संतप्त ग्रामस्थांनी चावणे पाणीपुरवठा योजना बंद करून वरील सर्व गावांसाठी रसायनी येथील पाताळगंगा एम.आय.डी. सी.च्या योजनेतून पाणीपुरवठा करावा ह्या मागणीसाठी राष्ट्र सेवा दल संघटनेच्यावतीने रायगड जिल्हा संघटक तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी १३ जुलै रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचे निवेदन दिले.
त्यानंतर रसायनी पोलिसांकडून जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सूचना देत रसायनी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी मोर्चेक-यांना १४९ च्या नोटिसा देऊन मोर्चा न काढण्याचे आवाहन केले. तरीही संतप्त लाडीवली अकुलवाडी, डोंगरवाडी, फलाटवाडी, चिंचेची वाडी स्टेशनवाडी व गुळसुंदे येथील मोर्चेकरी आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचे समजताच एरवी ताकास तूर लागू न देणारे रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता येझरे, पनवेल पंचायत समिती मधील ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग पनवेलचे उप अभियंता मेटकरी, खालापूर पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता इंगळे लाडीवली येथे पोहोचले.
यावेळी महिलांनी गावाच्या वेशीवरच त्यांचा समाचार घेत चावणे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून येणाऱ्या गढूळ पाण्याची बाटली अधिकाऱ्यांना देत ‘हे पाणी तुम्ही प्या साहेब, असे म्हणत शेकडो महिलांनी आपला संताप व्यक्त केला. आता पाण्यावीणा मरण्यापेक्षा मोर्चात येऊन कोरोनाने मेलो तरी चालेल असे म्हणत अभियंत्यांना फैलावर घेतले. त्यानंतर तब्बल साडेतीन तास उप अभियंता मेटकरी, कार्यकारी अभियंता येझरे मोर्चाचे नेतृत्वकर्ते संतोष ठाकूर, सुभाष शिगवण, विजया मांडवकर, सुरेखा वाघे, राजश्री म्हामुणकर, रेखा कालेकर, दर्शना म्हामुणकर यांच्यासह लाडीवली व आकुलवाडी येथील महिला प्रतिनधींसोबत झालेल्या चर्चेतून मोर्चेक-यांच्या मागण्या मान्य करीत यापुढे रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत नियमित पाणी पुरवठा करण्यात येईल. संबंधित सर्व गावे व वाड्यांमध्ये तसे वेळापत्रकही लावण्यात येईल. मोर्चेकऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे एम.आय. डी. सी. पाईप लाईनच्या चावणे गावाजवळ नवीन टॅपिंग घेऊन जल जीवन मिशन मधून पुनर्र जोडणी करण्याच्या कामाचा समावेश आराखडा सन २०२०-२०२१ मध्ये प्रस्तावित करून लाडीवली येथे जलकुंभात पाणी साठवून प्रस्तावित गावे व वाड्यात पाणीपुरवठा करण्यात येईल तसेच वितरण व्यवस्थेतील आवश्यक पाईपलाईन टाकून शेवटच्या घरापर्यंत पाणी उपलब्ध होईल याची दक्षता घेण्यात येईल यासाठी उद्भव म्हणून एम.आय.डी.सी.चे चावणे गावाशेजारील पाईप लाईन वरून कनेक्शन प्राप्त करण्यासाठी पंचायत समिती पनवेल व संबंधित कार्यालयाकडून नळजोडणी घेणे, जिल्हास्तरीय व प्रादेशिक स्तरावरील प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रिया व इतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून पुढील ४ महिन्यात नवीन योजनेतून शुद्ध व शाश्वत पाणीपुरवठा करण्यात येईल असे लेखी पत्र संतोष ठाकूर व लाडीवली ग्रामस्थानां दिल्याने मंगळवार दि. १३/०७/ २०२१ रोजी रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथील कार्यालयावर काढण्यात येणारा मोर्चा रद्द करण्याची विनंती केली.
परंतू याअगोदरचा अनुभव लक्षात घेता ठाकूर यांनी सदर मोर्चा काही दिवसांसाठी तात्पुरता स्थगीत करीत असलयाचे जाहीर करीत यापुढे मात्र असे प्रकार घडल्यास पाण्यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या पाणीपुरवठा विभागाच्या विरोधात न्यायालयात जाऊ असे सांगितले.








Be First to Comment