सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
राज्य शासनाने ५ एप्रिल पासून राज्यात कोरोना नियंत्रणाखाली आणण्यासाठी विविध नियम लागू केले आहेत. त्यानुसार शुक्रवार दि. ९ एप्रिल ते सोमवार दि. १२ एप्रिल पर्यंत सकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. उरणमध्ये कडकडीत संचारबंदी असून रस्ते सुनसान झाले आहेत.
राज्यासह रायगडात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात ५ एप्रिल २०२१ रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते ३० एप्रिल रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. राज्यात वाढत्या कोविड-१९ विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना म्हणून नव्याने लागू केलेल्या निर्बधांच्या अनुषंगाने हे आदेश जारी करण्यात आले आहेत.


उरणमध्ये ही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन उरणच्या जनतेकडून केले जात आहे. जनतेच्या सेवेसाठी ज्यांची गरज आहे. अशा सेवा सोडून बाकी सर्व बंद होते. तसेच कामा व्यतिरिक्त कोणीच रस्त्यावर फिरताना दिसत नव्हते. त्यामुळे नेहमीच गजबजलेले दिसणारे नाके, मासळी मार्केट आज मात्र मोकळे श्वास घेताना दिसत होते. त्यामुळे रस्ते मोठे आणि सुनसान दिसत होते. यासाठी नाक्यांनाक्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शहरासह गावोगावी संचारबंदीचे पालन केले जात होते. आज पासून सुरू झालेली संचारबंदी सोमवारी सकाळी उठणार आहे. तोपर्यंत हे वातावरण असेच रहाणार आहे. वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी शासनाच्या आवाहानाला जनतेकडून उत्फुर्तपणे पाठींबा मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.








Be First to Comment