
पनवेल, दि.30 (वार्ताहर) ः ‘नीट’ पाठोपाठ रविवारी होणारी शिक्षक भरती परीक्षेचा ‘टीईटी’चा पेपरदेखील फुटल्याने परीक्षा रद्द करण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ आज जिल्हाध्यक्ष डॉ.श्रृती म्हात्रे यांनी राज्य तसेच केंद्र शासनाचा निषेध केला आहे.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष डॉ.श्रुती म्हात्रे यांनी सांगितले की, नीट’ पाठोपाठ ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने वारंवार होणाऱ्या पेपरफुटीतून सरकारचे अपयश अधोरेखित होत आहे. यातून परीक्षार्थीचे वर्ष किंबहुना आयुष्य बरबाद होत असल्याचा आरोप त्यांनी केला. आमचे नेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक कॉलेजमध्ये जावून विद्यार्थ्यांना दिलासा देत आहोत. आज लाखो विद्यार्थी या परिक्षेत बसण्यासाठी तयारी करीत आहेत व अशा प्रकारे पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास डगमगू लागला आहे. या गोष्टीची दखल घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दादा भुसे तसेच केंद्रीयमंत्री धर्मेंद्र यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक हरिश केणी यांनी सुद्धा पेपर फुटीचा निषेध केला आहे.
शासनाकडे कोणतेही नियोजन नसल्याने या अशा प्रकारच्या घटना घडत असून हे शासनाचे अपयश असल्याचे त्यांनी सांगितले. तर जिल्हा प्रवक्ते अजय कापरे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी खेळण्याचा डाव केंद्र व राज्य सरकार करत असून आज विद्यार्थ्यांना या परिक्षेत बसण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. अनेकांनी आपली घरे-दारे तसेच सोने गहाण ठेवून ते परिक्षेची तयारी करून बसत आहेत. परंतु अशा प्रकारच्या घटनामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर मोठा विपरित परिणाम होत असून याबाबत आम्ही विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी मा.नगरसेविका शशिकला सिंग, नगरसेवक लतिफ शेख यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Be First to Comment