सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
सगळीकडे रंगात रंगून जाण्याचा धुलिवंदन सण साजरा होत असताना फॉन टीमने धुळवड वेगळ्याच रंगाने साजरी करण्याचे ठरवलं होते. एक पाणवठा पुन्हा पुनर्जीवित करून पक्षी प्राण्यांची पाण्याची सोय केली. मागचे तीन चार दिवस उन्हाचा पारा ४० ते ४१ अंशावर पोहोचला होता. भविष्यात तो कितीवर पोहोचेल सांगता येत नाही. पारा वाढला की साहजिकच पाण्याचे बाष्पीभवन सुद्धा त्याच प्रमाणात जास्त होऊ लागते. मानवाला जशी पाण्याची टंचाई निर्माण होते, तशी ती वन्यजीव आणि पक्ष्यांना सुद्धा निर्माण होते. आपण कुठूनही कसेही पाणी मिळवू शकतो, परंतु प्राणी त्यांचं स्थान सोडून इतर ठिकाणी जाताना त्यांना धोका निर्माण होऊ शकतो. कारण सर्वच लोकं आपल्यासारखा विचार करत नाहीत. आजही आपल्याच भागात भेकर, रानडुक्कर, ससे यांची सर्रास शिकार होत आहे.

याकरिता काल धुळवड या दिवशी दि.२९/०३/२०२१ रोजी कडापे - उरण म्हणजे उरण तालुक्याचे दक्षिणेकडील शेवटचं टोक, या गावाच्या जंगल परिसरात काही नैसर्गिक पाणवठे सुप्तावस्थेत आहेत, तर काहींचे पाणी थोड्या प्रमाणात वर्षाच्या बारा महिने काळ्या पाषाणातून वाहत आहे. त्यामुळे जे सुप्त पाणवठे आहेत त्यापैकी एक पाणवठा पुन्हा पुनर्जीवित करण्याचे कार्य केेले. धुळवडीत पाण्याचा अपव्यय टाळून वन्यजीव आणि पक्षी यांची तहान भागविण्यासाठी फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) या संस्थेने केले. याप्रसंगी जयवंत ठाकूर,त्यांची कन्या सृष्टी,राजेश पाटील,शेखर म्हात्रे,गोरख म्हात्रे, प्रणव गावंड, निकेतन ठाकूर, राकेश म्हात्रे,किशोर पाटील,अंगराज म्हात्रे यांच्या योगदानातून वन्यजीवांची तहान भागविण्याचा संस्थेचा हा छोटासा प्रयत्न. याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.








Be First to Comment