सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
कर्जत तालुक्यातील अति दुर्गम भागात जांबरुंग हे भीमाशंकरच्या पायथ्याशी वसलेले गाव आहे. तेथील जिल्हा परिषदेच्या शाळेत स्वच्छतागृहाची समस्या भेडसावत होती. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत विजयभूमी विद्यापीठ हे एक शैक्षणिक संकुल आकार घेत आहे. या संस्थेच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी तेथे दोन महिला स्वच्छता गृहे उभारून त्यांचा लोकार्पण सोहळा संपन्न करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
राज्यात सर्वच जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये प्राथमिक शाळा आहेत. शाळेच्या इमारती शासनामार्फत उभारल्या जातात परंतु त्यासाठी लागणारा विद्युत पुरवठा, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहे या महत्वाच्या गरजांसाठी शासकीय निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते. स्वच्छता गृह नसल्याने विद्यार्थीनी व महिला शिक्षिका यांची विशेष करून गैरसोय होते. ही जांबरुंग प्राथमिक शाळेत स्वच्छतागृह नसल्याचे विजयभूमी विद्यापीठाचे कुलगुरू संजय पडोडे यांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी शाळेच्या लगत दोन सुसज्ज महिला स्वच्छता गृह बांधली. त्याचा लोकार्पण सोहळा संस्थेच्या सदस्या कल्पना पडोडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच दत्तात्रेय पिंपरकर तसेच ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. विजयभूमी विद्यापीठाच्या वतीने लॉक डाऊनच्या काळात धान्य वाटत करून सामाजिक बांधिलकी जपली होती.








Be First to Comment