सिटी बेल लाइव्ह । उस्मानाबाद ।
गतवर्षीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयांनीच घेतलेले असल्यामुळे या परीक्षासाठी विद्यापीठांनी वसूल केलेले परीक्षा शुल्क परत करण्याची मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे.
गतवर्षीच्या( शैक्षणिक वर्ष 2019 20) पदवीच्या अंतिम वर्षाच्या (तृतीय वर्ष) परीक्षा कोरोनामुळे वेळेवर होऊ शकल्या नव्हत्या. अनेक वेळा पुढे ढकलल्या नंतर या परीक्षा घेण्याची जबाबदारी अंतिमतः त्या-त्या महाविद्यालयावर सोपविण्यात आली. त्यानुसार अगदी प्रश्नपत्रिका तयार करणे, ऑनलाइन परीक्षा घेणे तसेच उत्तरपत्रिका तपासणी ही सर्वच काम त्या-त्या महाविद्यालयांनी केली आहेत यासाठी त्यांना व व्यवस्थापनाला पदरचे पैसे खर्च करावे लागले आहेत. प्रत्यक्षात विद्यापीठांनी महाविद्यालयाकडून परीक्षा शुल्क म्हणून सालाबाद प्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांमागे सुमारे एक हजार रुपये शुल्क घेतले होते .यातून विद्यापीठाकडे करोडो रुपये जमा झाले. प्रत्यक्षात मात्र परीक्षा घेण्याचे काम हे महाविद्यालय यांनीच केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेषत ग्रामीण भागातील महाविद्यालयांना कामकाज चालवताना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यंदाच्या वर्षी विद्यार्थ्याकडून शैक्षणिक शुल्क वसूल करणे ही दुरापास्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर गतवर्षीचे परीक्षा शुल्क त्या-त्या महाविद्यालयांना विद्यापीठांनी परत करावे( किमान 80 टक्के रक्कम तरी) तसेच या वर्षी ही आत्तापर्यंतची परिस्थिती लक्षात घेता विद्यापीठे परीक्षा घेऊ न शकण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविद्यालयांना परीक्षा शुल्क भरण्यास भाग पाडू नये अथवा विद्यापीठ परीक्षा घेणार असल्यास परीक्षा शुल्कात पन्नास टक्के कपात करावी अशा दोन मागण्याही विद्यापीठांचे कुलपती आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे ॲड भोसले यांनी केली आहे.
Be First to Comment