अवकाळी पावसाने वाल पीकाचेही नुकसान
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
गेल्या तीन-चार दिवसांपासुन पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे तसेच वातावरणातील वारंवार होणा-या बदलामुळे विविंध आजार वाढले आहेत. याशिवाय वाल पीकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गांमध्ये चितेंचे वातावरण पसरले आहे.
सन २०२० या वर्षाची सुरूवात ही अंत्यत खराब झालेली असतांनाच शेवटही मोठ्या प्रमाणात नुकसान करुन जात असल्याची चिन्हे दिसुन येत आहेत. मार्च महिन्यापासुन जगावर उद्भवलेल्या महाभयंकर कोरोनाचे सावट, चक्रीवादळ, तसेच सद्यपरिस्थितीत सुरु असलेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकुल घातला आहे. वारंवार होणा-या वातावरणातील बदलामुळे वेगवेगळे आजार वाढले आहेत. ताप, सर्दी, खोकला अशा आजांराचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहेत. त्यामुळे पुन्हा कोरोनाची लाट येते की काय अशी भिती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. तसेच याआधीच उशिरापर्यंत सुरु राहीलेल्या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन आता सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे नागोठणे विभागातील प्रसिद्ध अशा कडव्या वाल पीकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळिराजा चितेंत पडला आहे.
दरम्यान या अवकाळी पावसामुळे महामार्गावरुन प्रवास करणा-या वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात होणा-या धुळीचा त्रास हा कमी झाला आहे. असे असले तरी आता खड्डे व चिखलातुन प्रवास करण्याची वेळ वाहनचालक व प्रवाशांवर आलेली आहे. त्यामुळे महामार्गावरुन प्रवास करणा-या वाहनचालकांचा व प्रवाशांचा प्रवास कधी सुखरुप होणार असा प्रश्न पडला आहे.








Be First to Comment