Press "Enter" to skip to content

चरीच्या शेतकरी संपाच्या आठवणींना उजाळा

मोदी सरकारला शेतकरीच धडा शिकवणार : माजी आमदार पंडित पाटील 🔷🔶🔷🔶


सिटी बेल लाइव्ह । अलिबाग । विशेष प्रतिनिधी । 🔶🔶🔷🔷


शेतकरी चळवळीचे प्रणेते नारायण नागू तथा ना ना पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांच्या हक्कासाठी लढल्या गेलेल्या चरी येथील शेतकरी संपाचा 87 वा वर्धापन दिन समारंभ आज चरी येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. शेकापक्षाचे नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, माजी आमदार पंडितशेट पाटील यांच्या अध्यक्षते खालील हा समारंभ सर्व शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करीत समारंभ साजरा करण्यात आला.

पंडितशेट पाटील यांनी आपल्या भाषणात चरी शेतकरी संपाबाबत बोलताना शेतकरी सुखी तर सारे जग सुखी असे उद्गार काढताना संपूर्ण देशात क्रांती निर्माण करणार्‍या या भुमीतच केंद्राच्या अन्यायी कायद्यांविरोधात पुन्हा एकदा एल्गार शेकापक्षाने कालच्या मोर्चातून केला आहे. त्यामुळे आता संपूर्ण देश पुन्हा एकदा पेटून उठेल आणि मोदी सरकारला धडा शिकविल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

चरी पंचक्रोशीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात या संपाचे शिलेदार स्व. ना ना पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाळा अर्पण करुन पंडित पाटील यांनी अभिवादन केले. त्यानंतर या संपाचे स्मारक असणार्‍या शेतकर्‍यांच्या औजारापासून बनविलेल्या स्मृतिस्तंभाला अभिवादन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी शेकापक्षाचे जिल्हा चिटणीस तथा आघाडीचे जिप पक्ष प्रतोद अ‍ॅड आस्वाद पाटील, राजिप सदस्य भावना पाटील, पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, पंचायत समिती सदस्य सुधीर थळे, चरी गु्रप ग्रामपंचायतीच्या सरपंच निलम पाटील यांच्यासहर गावातील ज्येष्ठ नागरिक, शिक्षक, बहुसंख्य शेतकरी आणि कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.

सागर थळे यांनी ईशस्तवन व शेतकरी संपावरील गीत सादर करुन वातावरण भारून टाकले. सुत्रसंचलन मनोज थळे यांनी केले. ग्रुप ग्रामपंचायत चरी, प्राथमिक शाळा चरी, ग्रामस्थ मंडख चरी, कोपरपाडा, कोपर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.  

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.