निसर्ग चक्रीवादळामुळे वावळोली आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य आणि वापरातील वस्तू नामशेष
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
निसर्ग चक्रीवादळात सबंध जिल्ह्यासह कोकणात कोट्यावधीची वित्तहानी केली. मनुष्यहानी देखील झाली. घरे, शाळा , वाडे, झाडे जमीनदोस्त झाली. सुधागड तालुक्यातील वावळोली आश्रमशाळेचे देखील मोठे नुकसान झाले. येथील तब्बल 560 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्यासह दैनंदिन वापरातील वस्तू भिजून पूर्णपणे खराब झाल्या आहेत. त्यामुळे या सर्व साहित्य व वस्तूंची आता विद्यार्थ्यांना गरज असून समाजसेवी संस्था व दानशूर व्यक्तींनी आदिवासी मुलांच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. अन्यथा ही मुले शिक्षणापासून वंचीत राहण्याची शक्यता आहे. आश्रमशाळा हे या विद्यार्थ्यांचे दुसरे घरच आहे. पहिलीत प्रवेश झाल्यावर अगदी 12 वी पर्यंत त्याला इथे शिक्षण मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांची पुस्तके, वह्या, शैक्षणिक साहित्य, कपडे, अंथरून, व इतर दैनंदिन वापरातील सर्वसाहित्य आश्रमशाळेतील निवासी खोल्यांमध्येच ठेवलेले असते. कोरोना आणि लॉकडाऊनमूळे आश्रमशाळा बंद असून विद्यार्थी त्यांच्या घरी आहेत. मात्र त्यांचे सर्व साहित्य आश्रमशाळेतच आहे. चक्रीवादळात आश्रमशाळेचे छत उडाले तसेच नुकसान झाले आणि हे सर्व शैक्षणिक व दैनंदिन वापरातील साहित्य अक्षरशः मातीमोल झाले आहे. परिणामी आश्रमशाळा सुरू झाल्यावर आदिवासी मुलांकडे ना पुस्तके, वह्या असणार आहेत ना कपडे, ना वापरासाठी वस्तू..! मग ही मुले अभ्यास कुठे करणार आणि राहणार कसे? हा प्रश्न आहे. इयत्ता पहिली ते 8 वीची पुस्तके शासनाकडून मिळाली आहेत. मात्र त्या विद्यार्थ्यांना देखील इतर शैक्षणिक साहित्य व वस्तूंची गरज आहे. म्हणूनच या सर्व आदिवासी मुलांना पुन्हा नव्याने शिक्षण घेण्यासाठी व जगण्यासाठी सर्व साहित्याची आवश्यकता आहे.
कोट चक्रीवादळामूळे विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक साहित्य, कपडे अंथरून व इतर साहित्य भिजून पूर्णपणे खराब झाले आहे. म्हणून समाजसेवी संस्था व दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन जमेल तशी मदत करावी.
सरिता सावंत, मुख्याध्यापिका, वावळोली आश्रमशाळा






Be First to Comment