पंधरा टक्के आदिवासी निधी दोन वर्षे न मिळाल्याने संताप #
सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे :
चौक ग्रामपंचायतीचे विभाजन होवून वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीत लोधिवली ग्रामपंचायत अस्तित्वात आली. सदर ग्रामपंचायतीला पाच वर्षंही पुर्ण झाले नाही तोच लोधिवली ग्रामपंचायतीचे नाव तालुक्यात चांगलेच चर्चेत आहे.या ग्रामपंचायतीकडून आदीवासी बांधवांना दोन वर्षे पंधरा टक्के आदिवासी निधी न मिळाल्याने संतापलेल्या ग्रामस्थांसह आदीवासी बांधवांनी चक्क लोधिवली ग्रामपंचायतीलाच टाळे ठोकले.

लोधिवली ग्रामपंचायतीचे सरपंचपद आदीवासी असतानाही आदीवासी विकासासाठी कोणताही विकास व वापरण्यात येणारा १५ टक्के निधीचा उपयोग आदीवासीकरीता होत नसल्याबाबत राजिप अध्यक्ष व उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच खालापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना नढाल ठाकुरवाडी येथील आदीवासी बांधवांनी २० जानेवारी २०२० रोजी पत्रव्यवहार केला होता.शिवाय वारंवार ग्रामपंचायतीकडेही आदीवासी बांधवांकडून विचारणा होत होती परंतु ग्रामविकास अधिकारी व सरपंच टाळाटाळ करत असल्याचे ग्रामस्थ आदीवासी बांधवांनी सांगितले.
लोधिवली ग्रामपंचायतीकडून आपल्यावर अन्याय होत असल्याने आदीवासी बांधवांनी १८ आॅगस्ट रोजी ग्रामपंचायत कमिटीला धारेवर धरले.यावेळी समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ग्रामपंचायत हद्दीतील सर्व आदीवासी बांधव व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कमिटीला कार्यालयाबाहेर काढून टाळे ठोकले.
ग्रामपंचायतीसह जबाबदार अधिका-यांची चौकशी करा अशी मागणी आदीवासी बांधवांनी व ग्रामस्थांनी केली. यावेळी शेकडो ग्रामस्थ व आदीवासी उपस्थित होते. सोशल डिस्टिंक्शनचे तिनतेरा वाजल्याचे चित्रही दिसून आले.
यावेळी माजी उपसभापती श्याम सालवी, मारुती तवले, एकनाथ सांगले आदींसह मोठ्या संख्येने ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ उपस्थित होते.






Be First to Comment