
पेण, ता. ७ (वार्ताहर) : आपल्या जीवाची पर्वा न करता मुंबई- गोवा महामार्गावर रस्ते अपघातग्रस्तांना रात्री अपरात्री तात्काळ मदत करुन त्यांचे प्राण वाचविण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून करत असणारे अपघातग्रस्तांचेवाली कल्पेश ठाकूर यांना दि. ७ रोजी जीवनदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रायगड जिल्हा पोलीस आयोजित रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत जीवनदूत सन्मान सोहळा आरसीएफ कुरुळ अलिबाग येथे आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्याला रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले, जिल्हाधिकारी किसन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आदि उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री भरत गोगावले यांनी सांगितले की मुंबई- गोवा महामार्गाचे काम लवकरच पूर्णत्वाकडे जाणार असल्याने यामुळे अपघातांचे प्रमाण सुद्धा कमी होणार आहे.त्यातच जिल्ह्यात ज्या कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना सहकार्य केले पाहिजे.तर युवकांनी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करावा, मद्य प्राशन करू वाहने चालवू नये तसेच रस्ता सुरक्षेतेचे कायम नियम पाळावे असे आवाहन करत कायम अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी तात्काळ उभा राहून अनेकांचा जीव वाचवणारा कल्पेश ठाकूर याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कल्पेश ठाकूर यांना जीवनदूत पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.


Be First to Comment