
पेण, ता. २४ (वार्ताहर) : राज्यात शेतकऱ्यांवर अनेक संकटे येत असतानाही शेतकऱ्यांनी या व्यवसायाला अधिक प्राधान्य देऊन रासायनिक खतांच्या ऐवजी नैसर्गिक खतांच्या वापरावरील अन्नधान्य आताच्या युगात खाल्लं पाहिजे असे वक्तव्य यशस्वी प्रगतशील शेतकरी मुक्तक जोशी यांनी पेण येथे बोलतांना केले.
पेणच्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयातर्फे भाऊसाहेब नेने स्मृती व्याख्यानमाले अंतर्गत यशस्वी आणि प्रगतशील शेतकरी मुक्तक जोशी यांचे “स्मार्ट शेती स्मार्ट करिअर”या विषयावरील व्याख्यान दिनांक २४ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाला पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड.मंगेश नेने, संस्थेचे सदस्य बाळासाहेब जोशी, प्राचार्य सदानंद धारप, डॉ. निता कदम, प्राध्यापक डी.के.बामणे, सौ.जोशी आदिंसह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ते अधिक म्हणाले की मी स्वतः अमेरिकेच्या एका प्रशस्त कंपनीमध्ये नोकरी करत असतानाही ती सोडून मागच्या सहा- सात वर्षांपासून आम्ही पती-पत्नी कृषी विभागाकडे वळलो आहोत. मध्यंतरीच्या काळामध्ये फार मोठी मेहनत घेतली त्यामुळेच आजवरचे आमचे उत्पन्न हे यशस्वी वाटचालीकडे आहे.९८ टक्के उत्पादन आम्ही आमच्या शेतातून घेत असून यामध्ये विविध प्रकारच्या भातशेती सह फळ भाज्या पशु व दुग्धजन्य पदार्थांशी निगडित असणारे गाई, म्हशी, शेळी यांच्याही माध्यमातून आर्थिक उत्पन्न घेण्यात आम्ही सक्षम झालो आहोत त्यामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबर शेतीकडे सुद्धा वळले पाहिजे असा संदेश त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.



Be First to Comment