Press "Enter" to skip to content

आदर्श नगरातील सांडपाणी व पाणीपुरवठा समस्यांवर ग्रामस्थ आक्रमक; ग्रामपंचायतीकडे निवेदन

रोहा:समीर बामुगडे

रोह तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील आदर्श नगर परिसरात सांडपाणी व्यवस्थापन आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले असून, संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात परिसरातील रहिवाशांनी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आदर्श नगर परिसरातील अनेक सांडपाणी चेंबर गेल्या अनेक दिवसांपासून तुंबलेल्या अवस्थेत आहेत. चेंबरमध्ये गाळ व कचरा साचल्याने सांडपाण्याचा निचरा होत नसून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.

याशिवाय काही चेंबरची झाकणे तुटलेली असून काही चेंबर उघड्या अवस्थेत असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे. परिसरात लहान मुले खेळत असल्याने कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उघड्या व धोकादायक चेंबरवर तात्काळ मजबूत लोखंडी सुरक्षा जाळी बसवण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, आदर्श नगरमध्ये पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीपुरवठा वारंवार खंडित होत असून नळाद्वारे मिळणारे पाणी गढूळ आणि अशुद्ध असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. अशा पाण्यामुळे नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून साथीचे रोग पसरण्याची शक्यता वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर परिसरातील सर्व चेंबरची तातडीने साफसफाई करावी, उघड्या चेंबरवर सुरक्षा जाळ्या बसवाव्यात तसेच पिण्याच्या पाण्याची लाईन दुरुस्त करून नियमित व शुद्ध पाणीपुरवठा सुरू करावा, अशा प्रमुख मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत.

प्रशासनाने या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा नागरिकांना पुढील आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, असा इशाराही काही रहिवाशांनी दिला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.