Press "Enter" to skip to content

वाढत्या महागाई विरोधात पनवेलमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा जनआक्रोश मोर्चा


पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून भाजप सरकार हे फक्त लोकांना गाजर दाखवून फसवणूक करत असल्याने याच्या निषेधार्थ आज पनवेलमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे जनआक्रोश मोर्चा काढून भाजप सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.

सदर मोर्चा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बबनदादा पाटील, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तहसील कार्यालयावर शेकडो शिवसैनिक, महिला आघाडी व युवा सैनिकांच्या साथीने काढण्यात आला.

या मोर्चामध्ये उपनेते बबनदादा पाटील, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांच्यासह सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख दिपक निकम, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, रामदास पाटील, महानगरप्रमुख ॲड.समाधान काशिद, गटनेत्या लिना गरड, मा.जिल्हाप्रमुख शिरिष बुटाला, तालुकाप्रमुख संदीप तांडेल, ज्ञानेश्वर बडे, शहरप्रमुख प्रवीण जाधव, यतीन देशमुख, सदानंद शिर्के, रामदास गोवारी, सुर्यकांत म्हसकर, प्रदीप केणी, नगरसेविका प्रगती पाटील, रितीशा गोवारी, प्रिया गोवारी, मेघना घाडगे, आर्या जाधव, उत्तम मोर्बेकर, नितीन गावंड, महिला आघाडीच्या संगीता राऊत, उज्वला गावडे, ज्योती मोहिते, मालती पिंगळा, सानिका मोरे, समिक्षा पांगम यांच्यासह शेकडो शिवसैनिक या जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना उपनेते बबनदादा पाटील यांनी सांगितले की, जनता महागाईने त्रस्त झाली असून शासन पैशाचे खोके वाटून उमेदवार विकत घेण्याचे काम करत आहे. महागाईमुळे जनता मेटाकुटीस आली आहे. असे असताना सरकार फक्त लेडीज बार, जुगार अड्डे आदींना परवानग्या देत आहेत. हे कुठल्याही परिस्थितीत शिवसेना बंद करणार आहे. फक्त अधिवेशनाच्या काळात बंद करण्यात येणारे लेडीज बार हे कायमस्वरुपी आता शिवसैनिक रस्त्यावर उतरुन बंद करणार असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.

तर यावेळी बोलताना रायगड जिल्हासंपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी शासनाचे वाभाडे काढून इंधन दरवाढीसह, गॅस दरवाढ करून सरकार सर्वसामान्य जनतेला लुटण्याचे काम करत आहे. परंतु या सरकारचा पापाचा घडा भरत आला असून पुढील काळात महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात परतेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी रस्त्यावर महिलांनी भाकरी भाजून व रिकामे सिलेंडर आणून तहसीलदार मिनल भोसले-भामरे यांना भेट दिल्या. तसेच निवेदन देवून शासनाविरोधात असलेला रोष त्यांच्या समोर व्यक्त केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.