
नियुक्तीवरून सुरू असलेल्या वादावर काँग्रेस जिल्हाध्यक्षा श्रुती म्हात्रे यांचे स्पष्टीकरण “ही निवड जनभावनेतून; कोणत्याही शिफारशीमुळे नाही”
पनवेल:
पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्तीनंतर सुरू झालेल्या वाद आणि कार्यकर्त्यांच्या नाराजीवर नवनियुक्त जिल्हाध्यक्षा श्रुती म्हात्रे यांनी पत्रकार आणि वृत्तवाहिन्या शी बोलताना प्रथमच सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. आपली नियुक्ती ही कोणत्याही शिफारस किंवा वशिल्यामुळे नसून पक्षातील अनुभव, कार्यकर्तृत्व आणि कार्यकर्त्यांच्या जनभावनेच्या आधारे झाल्याचा दावा त्यांनी केला.
श्रुती म्हात्रे यांनी सांगितले की, पनवेल तसेच उत्तर आणि दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष पदासाठी त्यांचे नाव चर्चेत होते. काँग्रेस पक्षाकडून तिन्ही ठिकाणांसाठी जिल्हाध्यक्ष पदाकरिता अर्ज प्रक्रिया जाहीरपणे राबविण्यात आली होती. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. रागिणी नायक यांनी रायगड आणि पनवेल परिसरात निरीक्षण दौरे आणि इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्या प्रक्रियेनंतरच पक्षाने आपल्यावर जबाबदारी सोपविल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “माझ्या नियुक्तीमागे कोणत्याही नेत्याची शिफारस किंवा वशिला नाही. पक्ष संघटनेतील कामाचा अनुभव, सातत्याने केलेले कार्य आणि कार्यकर्त्यांच्या भावनेतून मला ही जबाबदारी मिळाली आहे,” असे श्रुती म्हात्रे यांनी म्हटले आहे.
पनवेल काँग्रेसमधील नाराज गटाने मुंबईतील ‘टिळक भवन’ येथे जाऊन निवडीविरोधात आक्षेप नोंदविल्याबाबत बोलताना त्यांनी संयमी भूमिका घेतली. “प्रत्येकाची महत्वाकांक्षा वेगळी असते. त्यामुळे काही कार्यकर्ते टिळक भवन येथे गेले असतील. मात्र, ते माझेच बंधू आहेत. त्यांच्या निर्णयाचे मी स्वागत करते. न्याय जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे,” असे त्या म्हणाल्या.
“रीचेकिंगनंतरच निकाल अधिक स्पष्ट होतो”-
सध्याच्या वादावर भाष्य करताना त्यांनी, “रीचेकिंगनंतरच निकाल अधिक चांगला समजतो. त्यामुळे येत्या काही दिवसांत जर काही बदल किंवा निर्णय झाले, तर त्यातून वस्तुस्थिती स्पष्ट होईल,” असे सूचक वक्तव्य केले. तसेच निषेधाच्या माध्यमातून काही लोकांची दिशाभूल करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला. “२० मे रोजीच आम्हाला पदांची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी मला भेटून गेले होते,” असा दावा त्यांनी केला.
पदभार स्वीकारल्यानंतर आंदोलनात सहभाग-
श्रुती म्हात्रे यांनी पुढे सांगितले की, पक्षाच्या आदेशानुसार अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन आयोजित करण्यात आले. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी थेट कार्यकर्त्यांसोबत आंदोलनात सहभाग घेतला. “पक्षाने दिलेल्या आदेशानुसार आम्ही एकत्रितपणे आंदोलन केले. संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न राहील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.


Be First to Comment