
“राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती” विशेष संग्राह्य अंकाचे भव्य अनावरण
मुंबई (प्रतिनिधी) “मैं नरेंद्र दामोदरदास मोदी….”
२६ मे २०१४ रोजी देशाच्या राजधानीतून पहिल्यांदा घुमलेला हा आवाज आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात घर करून राहिला आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गौरवशाली कार्यकाळाला उद्या १२ वर्षे पूर्ण होत आहेत. हा कालखंड म्हणजे विश्वासातून विकासाकडे, संकल्पातून सिद्धीकडे आणि स्वप्नातून सत्याकडे झालेल्या नवभारताच्या परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास ठरला आहे.
गरीब कल्याण, आत्मनिर्भर भारत, डिजिटल क्रांती, पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विकास, जागतिक स्तरावर भारताची वाढती प्रतिष्ठा, महिलांचे सक्षमीकरण, शेतकरी कल्याण, युवकांसाठी नव्या संधी आणि राष्ट्रीय सुरक्षेची भक्कम बांधणी अशा विविध क्षेत्रांमध्ये गेल्या १२ वर्षांत भारताने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे भारत आज जगातील प्रभावी आणि विश्वासार्ह महासत्ता म्हणून नव्या उंचीवर पोहोचत असल्याची भावना देशवासीयांमध्ये निर्माण झाली आहे.
या यशस्वी आणि ऐतिहासिक प्रवासाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याच्या उद्देशाने भाजपा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने ‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ हा विशेष संग्राह्य अंक प्रकाशित करण्यात आला आहे. देशाच्या विकासगाथेचे विविध पैलू, केंद्र सरकारच्या ऐतिहासिक निर्णयांचा आढावा, सामाजिक परिवर्तनाची दिशा आणि विकसित भारताच्या संकल्पनेचा वेध या विशेष अंकामध्ये घेण्यात आला आहे.
तपपूर्तीच्या पूर्वसंध्येला दादर येथील रविंद्र नाट्य मंदिर येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात या विशेष संग्राह्य अंकाचे अनावरण संपन्न झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना, गेल्या १२ वर्षांत भारताने प्रत्येक क्षेत्रात घडवलेली प्रगती ही अभिमानास्पद असल्याचे सांगितले. “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास” या मंत्राच्या माध्यमातून देशाला विकासाच्या नव्या युगात नेण्याचे कार्य मोदी सरकारने केले असल्याचे नमूद केले. मेक इन इंडिया आणि आता देश मेक फोर वर्ल्ड प्रमाणे प्रगती करत असल्याचे अधोरेखित करत आपला देश मोठ्या प्रमाणात विकासाची वाटचाल करत प्रत्येक आवश्यक क्षेत्रात आघाडी घेत असल्याचेही उदाहरणासह त्यांनी सांगितले.
राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ हा विशेष संग्राह्य अंक देशाच्या विकासगाथेचा प्रेरणादायी दस्तऐवज ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री मंगल प्रभात लोढा, भाजपा मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस आ. योगेश सागर, प्रदेश सरचिटणीस संजय कुटे, प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह माध्यम क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते.



Be First to Comment