

पनवेल (प्रतिनिधी) भारतीय लोकशाहीतील ऐतिहासिक आणि परिवर्तनकारी टप्पा मानल्या जाणाऱ्या ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी व जनसमर्थन मिळविण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने आज (गुरुवारी) पनवेल शहरात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.
भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा प्रिया मुकादम यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या पदयात्रेत पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, उपमहापौर प्रमिला पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला व बाल कल्याण सभापती ममता म्हात्रे, पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील, माजी महापौर कविता चौतमोल, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, भाजपच्या जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, रमेश मुंढे, प्रल्हाद केणी, जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने महिला आणि नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
पदयात्रेची सुरुवात पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयापासून करण्यात आली. त्यानंतर बाजारपेठ मार्गे जात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून पुढे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ही पदयात्रा पुढे सरकत ठिकठिकाणी जनजागृती करण्यात आली. संपूर्ण पदयात्रेदरम्यान घोषणाबाजी, फलक आणि बॅनरच्या माध्यमातून ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’चे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले. यावेळी या कायद्याच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीमही राबविण्यात आली, ज्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या मनोगतातून या अधिनियमाचे महत्त्व अधोरेखित केले. लोकसभा व राज्य विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारा हा कायदा महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले. या निर्णयामुळे धोरणनिर्मितीत महिलांचा सहभाग वाढून देशाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ हा केवळ आरक्षणाचा कायदा नसून महिलांच्या सन्मानाचे आणि समान हक्कांचे प्रतीक आहे. या माध्यमातून सामान्य कुटुंबातील कर्तृत्ववान महिलांना राजकारणात येण्याची संधी उपलब्ध होणार असून, देशाच्या प्रगतीत महिलांचा सहभाग अधिक बळकट होणार आहे. पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिलांचे व नागरिकांचे त्यांनी आभारही मानले तसेच हे विधेयक मान्य होईपर्यत आणि त्यानंतरही पाठिंबा कायम रहावा, तसेच नारी शक्ती वंदन अधिनियमला पाठींबा देण्यासाठी ९६६७१७३३३३ या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
भविष्यातही महिलांच्या हक्कांसाठी व सक्षमीकरणासाठी अशा जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येईल, असा निर्धार जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी यावेळी व्यक्त केला. विकसित भारताच्या निर्मितीसाठी महिलांच्या शक्तीचा प्रभावीपणे उपयोग करून घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगून हा कायदा भारताच्या लोकशाही व्यवस्थेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी पाऊल ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. या पदयात्रेदरम्यान ‘भारत माता की जय’, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, राष्ट्रमाता सावित्रीबाई गूळ यांचा विजय असो, ‘राजमाता जिजाऊ यांचा विजय असो’, झाशीची राणी लक्ष्मीबाईंचा विजय असो, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा विजय असो, नारी शक्ती देशाची प्रगती, स्त्री सन्मान देशाचा अभिमान, ‘नारी शिकवा नारी वाचवा’, सशक्त नारी सशक्त भारत’, ‘सशक्त नारी समर्थ राष्ट्र’, ‘तिच्या कष्टाने उभा राहतो संसार नारीशक्तीमुळेच उजळतो प्रत्येक परिवार’ अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.





Be First to Comment