
वन्यजीव-मानव संघर्ष कमी करण्यासाठी आधुनिक सापळा हस्तांतरण
खालापूर तालुक्यात वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे… वनसंपदा अबाधित राखणे आणि वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन व्हावे या उद्देशाने खालापूर तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार सातत्याने प्रयत्नशील असून, स्थानिक संस्था आणि निसर्गप्रेमींसोबत समन्वय साधत विविध उपक्रम राबवले जात आहेत.
तालुक्यात वाढता वन्यजीवांचा वावर, अपघातांची शक्यता आणि जखमी प्राण्यांच्या उपचारासाठी आवश्यक सुविधा लक्षात घेता, वन विभागाने हेल्प फाउंडेशन आणि आहिल फेन्सिंग अँड गॅबियन कंपनीच्या सहकार्याने एक अत्याधुनिक सापळा (पिंजरा) तयार करून घेतला आहे.
दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी हा सापळा वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला. या निमित्ताने आयोजित छोटेखानी कार्यक्रमात वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, हेल्प फाउंडेशनचे सदस्य तसेच आहिल फेन्सिंग अँड गॅबियनचे प्रमुख अश्फाक लोगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची उपस्थिती होती.
अश्फाक लोगडे हे हेल्प फाउंडेशनचे सदस्य असून त्यांनी स्वतः डिझाइन केलेला हा पिंजरा निशुल्क स्वरूपात वन विभागाला सुपूर्द केला. यापुढेही अशा प्रकारचे सापळे तयार करण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.
यावेळी वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, लोकसहभागातूनच वन, वनसंपदा आणि वन्यजीवांचे संरक्षण शक्य असल्याचा विश्वास व्यक्त केला. तर वनपाल भगवान दळवी यांनी या उपक्रमात विशेष भूमिका बजावली. वनरक्षक घुटे, चंदन नागरगोजे, गायकवाड, काटकर , सागर टोकरे कोळी, मयूर निकम , धनाजी, सावंत तसेच वनपाल नितीन कांबळे यांचे सोबत सोबत खोपोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक किशोर पानसरे, हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, हनीफ कर्जीकर, अमोल कदम, अमोल ठकेकर, प्रवीण शेंद्रे, आकाश सताने, सरफराज पटेल, दिनेश पाटील यांच्यासह प्राणीमित्र उपस्थित होते.





Be First to Comment