Press "Enter" to skip to content

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण

एकवीरा देवीच्या मंदिराचा कळस 8 वर्षांनी परत देवळावर स्थापन ; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

लोणावळा : सतिश पाटील

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आई एकवीरा देवीच्या मंदिरात तब्बल आठ वर्षांनंतर एक ऐतिहासिक आणि आनंदाचा क्षण पाहायला मिळाला. 8 वर्षांपूर्वी चोरीला गेलेला मंदिराचा कळस गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर, गुरुवारी (दि. 19) कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा मंदिरात आणण्यात आला आहे. यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे आणि नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुमारे आठ वर्षांपूर्वी काही चोरट्यांनी एकवीरा देवीच्या मंदिराचा कळस चोरून नेला होता. त्यानंतर पोलिसांच्या तपासात हा कळस हस्तगत करण्यात यश आले होते. मात्र, कायदेशीर कचाट्यामुळे तो गेली आठ वर्षे पोलिस कस्टडीतच अडकून पडला होता श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे आणि सर्व विश्वस्त मंडळाने यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून हा कळस पुन्हा देवस्थानाच्या स्वाधीन करण्यात आला.

गुढीपाडव्याच्या मंगलदिनी लोणावळा ग््राामीण पोलिस ठाणे येथे हा हस्तांतरणाचा सोहळा पार पडला. लोणावळा ग््राामीण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या उपस्थितीत रीतसर प्रक्रिया पूर्ण करून हा कळस विश्वस्तांकडे सुपूर्द करण्यात आला.

या वेळी श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, पोलिस निरीक्षक दिनेश तायडे, वरिष्ठ उपाध्यक्ष मारुती देशमुख, सचिव नवनाथ देशमुख, उपाध्यक्ष सागर देवकर, खजिनदार संजय गोविलकर, सह खजिनदार विकास पडवळ, सहसचिव महेंद्र देशमुख, संदीप देवकर आदी उपस्थित होते. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कळस पुन्हा मंदिरात परतल्याने यंदाचा पाडवा भाविकांसाठी खऱ्या अर्थाने गोड झाला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.