Press "Enter" to skip to content

पनवेल भगिनी समाज या सामाजिक संस्थेची १०० वर्षे पूर्ण

२ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

पनवेल दि.३०(वार्ताहर): पनवेल येथील पनवेल भगिनी समाज या सामाजिक संस्थेची नुकतीच १०० वर्षे पूर्ण होत असून त्या निमित्त येत्या २ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

पनवेल भगिनी समाज ही एक सामाजिक संस्था आहे. याची स्थापना सावरकर चौकात असणाऱ्या जानवेकर वाड्यात झाली. जनवेकर काकू आणि त्यांच्या काही मैत्रिणी या दुपारच्या वेळात गप्पा मारत असत. त्यावेळी त्यांच्या मनात विचार आला की नुसत्या गप्पा मारण्याऐवजी आपण एक मंडळ काढुया. अशा विचारातून १/ ऑगस्ट १९२५ रोजी या मंडळाची स्थापना झाली. त्याकाळी आपली संस्कृती परंपरा जपण्याची रीत होती. श्रावणमासातील मंगळागौर ज्यावेळी अमावस्येला येते त्यावेळी आणि तिसऱ्या मंगळवारी पूजा केली जात नसे. अशावेळी नवविवाहिताना पूजेची संधी आपण द्यावी, तसंच घटस्थापनेच्या वेळेस येणारी अष्टमीची पूजा म्हणजेच जिला श्रीमहालक्ष्मी पूजन म्हणतात, ते घरगुती होऊ शकत नाही. त्याला मनुष्यबळ आणि आर्थिक बळही खूप लागत त्यामुळे या दोन्ही पूजेची व्यवस्था त्यांनी त्यांच्या मंडळापासून सुरू केली. ती आजतागायत अव्याहत सुरू आहे.

नंतर १९६५ मध्ये बालसंस्कार होण्यासाठी बालवाडी सुरू केली. घरोघरी जाऊन मुलांना शाळेत येण्यासाठी आणि पालकांनी त्यांना शाळेत पाठवण्यासाठी या महिला त्यांना तयार करत होत्या, अशी ही श्री गणेश विद्यामंदिर ही शाळा जवळजवळ २००५ पर्यन्त सुरू होती. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वर्षअखेर महिलांच्या स्पर्धा घेण्याची सुरुवात झाली जी आजही सुरू आहे. यातील सभासद महिला दासमारुती उत्सव सुरू असतो तेथे त्या नऊ दिवसात दिवसभर कार्यक्रम सुरू असतात त्यात भाग घेत, त्यात दुपारी महिलांच्या कार्यक्रमात आमच्या मंडळाची एक नाटिका कायम असते. या उपक्रमाचे यंदाचे अठ्ठावीसवे वर्ष आहे. तसेच वर्षातून तीन चार कार्यक्रमात व्याख्यान, प्रवचन या माध्यमातून महिलांच्या विकासात वाढ करण्याचा प्रयत्न करतो. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी दरवर्षी अहिल्याबाई होळकर पुण्यतिथीनिमित्त निमित्त निराधार वृद्धाश्रम, अनाथआश्रम यांना देणगी दिली जाते.

श्रीमहालक्ष्मी पूजनाच्या वेळी देवीसमोर ओटीचे जे ५० किलोच्या आसपास तांदूळ जमा होतात तेही एखाद्या निराधार वृद्धाश्रम किंवा अनाथ आश्रमास दान दिले जाते. मुख्य म्हणजे साधारण १९८० च्या सुमारास आपली मंडळाची स्वतःची वास्तू असावी असं त्यांच्या मनात आलं, सगळ्यानी मनावर घेऊन घरोघरी, दुकानात जाऊन मंडळासाठी देणगी गोळा केली आणि आमची स्वतःची वास्तू तयार होऊन साधारण १९८७ मध्ये ती आमच्या हातात आली. त्यामुळे जेष्ठराज गणपती मंदिरात भरत असणारी आमची बालवाडी स्वतःच्या वास्तूत भरू लागली.जिच्या सावलीत आम्ही आजही पूर्वीच्या जेष्ठांच्या कामाचा वारसा पुढे पुढे नेत आहोत.

सध्या या संस्थेच्या अध्यक्षा मनीषा मोरेश्वर भिडे, उपाध्यक्ष रजनी नारायण भानू, खजिनदार सुजाता प्रदीप हर्डीकर, सहखजिनदारउमा महेश आपटे, सचिव वैशाली विलास , कुलकर्णी, सहसचिव रमा माधव अभ्यंकर, अर्चना अनिल कुलकर्णी, अंजली विश्वास दांडेकर, स्नेहल हेमंत दीक्षित, प्रांजली प्रवीण काणे, आदिती उपेंद्र मराठे, सल्लागार, शरयू चंद्रशेखर खरे, लीना वसंत खरे, शितल सतीश रानडे आदी कामकाज पाहत आहेत.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.