Press "Enter" to skip to content

गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी धर्माच्या बाजूने उभे रहा !– सुनील कदम, हिंदू जनजागृती समिती

सनातन संस्थेच्या वतीने पनवेल आणि उरणसह देशभरात ७७ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न !

रायगड – धर्म, राष्ट्र आणि न्याय यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने स्वतःला झोकून देणे, हेच खरे गुरुपूजन ठरेल. प्राचीन काळापासून प्रत्येक वेळी धर्माच्या बाजूने उभे असणार्‍यांपेक्षा अधर्मी आणि अन्याय करणाऱ्यांची संख्या आणि शस्त्रबळ अधिक होते; पण अंतिम विजय हा धर्माचाच झाला आहे.; कारण भगवंत आणि गुरुतत्त्वाचा आशीर्वाद धर्माच्या रक्षणासाठी कार्यरत असणार्‍यांवरच असतो. आजही गुरुतत्त्व सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि भारताच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहे. त्यामुळे प्रत्येकाने राष्ट्र आणि धर्माच्या कार्यासाठी झोकून देणे आवश्यक आहे. गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी धर्माच्या बाजूने उभे रहा, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी केले. ते ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील कर्तव्ये’ या विषयावर १० जुलै रोजी पनवेल येथील श्री बँक्वेट्स येथे संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते. यंदा गुरुपौर्णिमा महोत्सव देशभरात ७७ ठिकाणी आणि रायगड जिल्ह्यात पनवेल आणि उरण येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

महोत्सवाचा प्रारंभ श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाला. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले गेले. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या प्रेरणादायी व्हिडिओचे प्रक्षेपण करण्यात आले. रामराज्य स्थापनेसाठी संकल्प व सामूहिक नामजप करण्यात आला. धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विषयांवरील ग्रंथप्रदर्शन आणि फलक प्रदर्शन लावण्यात आले होते.

पनवेल येथील महोत्सवात भाजपचे प्रदेश संयोजक श्री. धनराज विसपुते म्हणाले, ‘विद्यार्थ्याना घडवण्यासाठी केवळ भौतिक ज्ञान न देता नीती, संस्कार, साधना, नामजप आणि मूल्य आधारित आध्यात्मिक ज्ञान हे मिळणे आताच्या काळात अत्यंत आवश्यक आहे. या आचरणानेच केवळ आपले नव्हेच तर राष्ट्र आणि धर्माचे रक्षण होणार असून हे करणे आपलेच दायित्व आहे.’

उरण येथील महोत्सवात अधिवक्ता सौ. वृषाली पाटील म्हणाल्या, ‘भारत देशात बहुसंख्य हिंदू असून सुद्धा भारत हिंदुराष्ट्र का नाही ? याचा विचार करून प्रत्येकाने धर्माचरण करणे आवश्यक आहे. हिंदूंनी आता स्वतःच्या रक्षणासाठी उभे राहिले पाहिजे. धर्माचरण, साधना, नैतिकता आणि स्वधर्म जपण्यावर भर देत समाजातील प्रत्येक व्यक्तीने राष्ट्रासाठी आध्यात्मिक आणि व्यावहारिक जबाबदारी स्वीकारावी.’ यावेळी सनातन संस्थेच्या सौ. प्रवीण पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव: देश-विदेशांतील हजारो भाविकांसाठी मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ आणि मल्याळम् भाषांमध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले. अनेक भाविकांनी याचा लाभ घेतला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.