

न्हावा ग्रामस्थांना विमानतळ प्रकल्पात नोकरीत प्राधान्य मिळायला हवे
उलवे, ता. ४ : १९८० च्या दशकात न्हावा येथे माझगाव डॉक आणि ओएनजीसीसारखे प्रकल्प आल्यावर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला होता. त्यामुळे एकेकाळी न्हावा गावाने जिल्ह्यातील हजारो तरुणांना रोजगार दिला. आज येथील तरुण उच्चशिक्षित झालाय, पण रोजगार नाही. त्यामुळे प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोकरीत सर्वाधिक प्राधान्य न्हावा गावातील तरुणांना मिळायला हवे, असे मत आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी न्हावा येथे व्यक्त केले.
न्हावा येथील तरुणांनी ‘श्री गावदेवी अवजड वाहतूक वेल्फेअर असोसिएशन’ची स्थापना केली. असोसिएशनच्या नामफलकाचे उद्घाटन महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते झाले. त्यावेळेस ते बोलत होते.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष काशिनाथ ठाकूर, उपाध्यक्ष गणेश ठाकूर, खजिनदार चंद्रकांत पाटील, सचिव चंद्रकांत भोईर, आशीष पाटील, गजानन म्हात्रे, भगवान पाटील, महेंद्र पाटील, मीनाक्षी पाटील, विजया ठाकूर, सरपंच विजेंद्र पाटील, उपसरपंच शैलेश पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment