Press "Enter" to skip to content

कलाकारांना राजाश्रय मिळायला हवा : महेंद्रशेठ घरत

पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात “महाराष्ट्र सखी” चा “कला तुमची साथ आमची” कार्यक्रम


उलवे, ता. १ : आपल्यात असलेल्या उपजत गुणांना वाव देऊन ती फुलविणे म्हणजे कला. विविध प्रकारच्या कला असल्या तरी अभिनय, गायन, वादन, नृत्य या कला आपल्याला धकाधकीच्या जीवनात जगण्यास नवीन ऊर्जा देतात. त्यामुळे त्या अंगिकारणारा कलाकार महान आहे, त्या कलाकाराला व्यासपीठ मिळणे, त्याला प्रोत्साहन देणे, कलेला आणि कलाकारालाही लोकाश्रय व राजाश्रय मिळणे ही काळाची गरज आहे. सरकारने यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मत आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ‘महाराष्ट्र सखी’च्या ‘कला तुमची साथ आमची’ या कार्यक्रमात व्यक्त केले.  

कलेला खऱ्या अर्थाने राजाश्रय देणारे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘हास्य जत्रा’ फेम अभिनेत्री लॉली म्हणजेच नम्रता संभेराव, चेतना भट यांच्या उपस्थितीने आणि कलेने रसिक मंत्रमुग्ध झाले होते. यावेळी विविध कलाकारांनी आपली कला सादर केली, त्याला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपाली पाटील यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपाली पाटील म्हणाल्या, “महिलांनी सोशल मीडियाचा वापर जपून करावा, अलीकडे सर्वाधिक फसवणूक चुकीच्या मार्गाने सोशल मीडिया हाताळल्याने होत आहे. आपण अनेक गोष्टी काहीही न पाहता शेअर करतो, त्याचाच फायदा फसवणूक करणारे घेत आहेत, त्यामुळे फसवणुकीची कुठलीही घटना घडल्यास सर्वप्रथम तक्रार दाखल करा, आमची पोलिस यंत्रणा त्यासाठी निश्चितच सक्षम आहे.”

हेमलता गायकवाड, कविता ठाकूर, रेश्मा कोरे यांच्या त्रिवेणी संगमाने कार्यक्रम यशस्वी झाला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.