Press "Enter" to skip to content

शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांचे स्तर उंचाविण्याचे काम पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सातत्याने होत आहे व हे काम कौतुकास्पद आहे ः आ.प्रशांत ठाकूर


पनवेल, दि.21 (संजय कदम) ः शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांचे स्तर उंचाविण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सातत्याने होत आहे त्यामुळेच अनेक विद्यार्थी 10, 12 वी चे शिक्षण घेत असताना 97% पर्यंत पोहचून दैदिप्यमान यश मिळवितात हे सर्व कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पनवेलचे आ.प्रशांत ठाकूर यांनी आज पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आज आयोजित करण्यात आलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी केले.

या कार्यक्रमाला आ.प्रशांत ठाकूर यांच्यासह आ.विक्रांत पाटील, म्हाडाचे मा.सभापती बाळासाहेब पाटील, पनवेल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन इक्बाल काझी, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे, मा.नगरसेवक मुकीत काझी, नुर पटेल, पो.नि.अभिजीत अभंग, मुख्याध्यापक जनाब आरिफ फरदिन पटेल, मोहम्मद नुर पटेल, अमिउद्दीन पटेल, फाजीत पटेल, नासिर अब्दुल हाफिज पटेल, निसार पटेल, आचिप जुबेर मुल्ला, जुबेर अब्दुल, रज्जाक पटेल, अकिल अधिकारी, बाबा मास्टर, मा.नगरसेविका नाज हाफिज, जैनाब शेख, मा.नगरसेविका शर्फिना हनिफ मुल्ला, फरहत मॅडम, खालिद पिट्टू आदींसह अनेक मान्यवर विद्याथ्यार्र्ंचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ.प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, शिक्षणाच्या माध्यमातून अनेक युवा पिढी वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेत आहे. देशात व जगात अत्याधुनिक शिक्षण प्रणाली आता रुजू होवू लागली आहे त्याचा फायदा आजच्या विद्यार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे. पनवेल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन इक्बाल काझी हे गेली अनेक वर्षे विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चाने शैक्षणिक दृष्ट्या ते सक्षम होण्यासाठी धडपडत आहेत. शिक्षणाप्रती त्यांचे असलेले प्रेम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वाढदिवसाच्या पूर्व संध्येला त्यांनी हा कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना एक वेगळीच भेट दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

तर यावेळी बोलताना आ.विक्रांत पाटील यांनी सुद्धा शिक्षणाचे महत्वाबद्दल आपले विचार मांडताना आज तरुण पिढी त्यामध्ये प्रामुख्याने मुली शिक्षणात पुढे येत आहेत हे कौतुकास्पद आहे. आगामी काळात या माता-भगिनी आपल्याला वेगवेगळ्या उच्च पदावर बसलेल्या दिसतील त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिक्षणाचा स्तर उंचाविण्यासाठी अहोरात्र झटत आहेेत. त्यामुळेच शिक्षण क्षेत्रात सुद्धा महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर म्हाडाचे मा.सभापती बाळासाहेब पाटील यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, आमच्या काळातील शिक्षण व आताची शिक्षण प्रणाली यामध्ये जमिन आसमानाचा फरक आहे. त्या काळात 60 ते 70% मिळविणारा विद्यार्थी प्रथम येत होता. तर आज 97% गुण मिळवून विद्यार्थीनी प्रथम आली आहे. हा आपल्यासाठी गौरवच आहे. पनवेल एज्युकेशन सोसायटीला आम्ही वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे. इक्बाल भाई यांनी कधीही हाक मारावी आम्ही त्यांचा हाकेला ओ देतो व त्यांना येणारी अडचण आम्ही दूर करतो त्यामुळेच आमचे व त्यांच्यामध्ये कौटुंबिक नाते आहे. पनवेलमध्ये हिंदू-मुस्लीम एकत्रितरित्या राहत असल्याने कोणताही अनुचित प्रकार येथे घडत नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी सुद्धा दोन वर्षामध्ये हा चांगला अनुभव घेतला आहे. विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे उच्च शिक्षण घ्यावे व त्यांना हवी ती मदत हे पनवेलचे दोन्ही आमदार करतील असा विश्‍वास त्यांनी यावेळी प्रकट केला आहे.

तर पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इक्बाल काझी यांनी सुद्धा यावेेळी बोलताना सांगितले की, पनवेल एज्यकेशन सोसायटीच्या पनवेल, तळोजा व बारपाडा येथे तीन शाळा आहेत. आमच्या काळात शिक्षण घेताना अनेक अडचणी येत होत्या. परंतु आताच्या आधुनिक युगामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायला कमी त्रास होत आहे. असे असले तरी तळागळातील लोकांपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे व ते उच्च शिक्षित झाले पाहिजे. त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येवू नये यासाठी आम्ही सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी 10 वी, 12 वी यशस्वी विद्यार्थी त्याचप्रमाणे स्कॉलरशिप उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.