Press "Enter" to skip to content

मोदी सरकारचे कार्य जनतेपर्यंत पोहचवा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या आतापर्यंतच्या अकरा वर्षाच्या कालावधीत खूप मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली आहेत. गोरगरिबांसाठी विविध योजनांच्या माध्यमातूनही मोदी सरकारने काम केले. हे काम आपण लोकांपर्यंत पोहचवले पाहिजे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते खारघरमधील रामशेठ ठाकूर कॉलेज येथे आयोजित संकल्प से सिद्धी या कार्यशाळेत बोलत होते.

केंद्र सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने पनवेल विधानसभा मतदारसंघातील पनवेल तालुका उत्तर मंडळाच्या वतीने संकल्प सिद्धी या कार्यशाळेचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातांमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींना या वेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
       

  या कार्यशाळेला भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, पनवेल तालुका उत्तर मंडळाचे संपर्कप्रमुख राजेश भगत, अध्यक्ष दिनेश खानावकर, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, माजी नगरसेवक हरिश केणी, पापा पटेल, मन्सूर पटेल, माजी नगरसेविका मंजुळा कातकरी, महिला मोर्चा अध्यक्ष आशा बोरसे, रविकांत म्हात्रे, किरण दाभणे, सरचिटणीस विनोद घरत, अंकुश पाटील, समीर गोंधळी, सचिन वासकर, प्रभाकर जोशी, युवा मोर्चाचे अध्यक्ष आशिष कडू यांच्यासह पदाधिकारी, बूथ अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
         

आमदार प्रशांत ठाकूर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीत अनेक विक्रम प्रस्थापित केले. गोरगरिबांसाठी अनेक योजना राबविल्यामुळे ग्रामीण आणि शहरी गरीब वर्गाचा विश्वास मोदी सरकारने मिळवला. जगाच्या पाठीवर भारताची प्रतिमा उंचावण्याचे कामही त्यांनी केले. आज सक्षम देश म्हणून भारताकडे आता पाहिले जातेय ही आपल्या भारताची ओळख होत चालली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश ताकदीने उभा राहताना जगाला पाहायला मिळाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.