Press "Enter" to skip to content

दत्ता म्हात्रे सर (मंत्रीवाडी) व मित्र परिवार आयोजित दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न ; संपूर्ण वाशी विभागामध्ये प्रथमच झालेल्या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक !!

पेण (प्रतिनिधी) प्रत्येक विद्यार्थ्याच्या आपल्या शैक्षणिक वाटचालीतील दहावी – बारावी बोर्ड परीक्षेचा टप्पा करिअर दृष्टीने अतिशय महत्वाचा समजला जातो. शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक संकटाशी सामना करत आपले शिक्षण पूर्ण करावे लागते हि वस्तुस्थिती आहे.

यावर्षी अशाच खारेपाट पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी स्वतः च्या जिद्द, मेहनत, चिकाटीच्या जोरावर व पालक, शिक्षक यांच्या मार्गदर्शनातून दहावी बारावी परीक्षेत सुयश प्राप्त करून आपल्या कुटुंबाचे नाव रोशन करून गावाचे नाव देखील प्रकाशात आणले अशा विद्यार्थ्यांची दखल घेऊन एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याच्या सद्हेतूने श्री दत्ता म्हात्रे सर (मंत्रीवाडी, वढाव/ रायगड) व मित्र परिवार यांच्या वतीने रविवारी १८ मे २०२५ रोजी पंचक्रोशीतील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या गुणगौरव सोहळ्याच्या माध्यमातून वाहतुकीची सुविधा नसल्याने कित्येक मैल पायी प्रवास करून आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर उत्तीर्ण झालेल्या इयत्ता दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मंत्री वाडी या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. सदर गणगौरव सोहळ्यामध्ये पंचक्रोशीतील एकूण ५० पेक्षा जास्त विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा गुणगौरव करण्यात आला.यावेळी पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह तसेव भेटवस्तू देऊन सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना दहावी व बारावी नंतर आपण कोणते क्षेत्र निवडावे, करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत या संदर्भात प्रमुख मार्गदर्शक म्हणून M.D. कॉलेज रूपारेल चे प्राध्यापक तसेच जर्मनी येथे व्हिजिटिंग सायंटिस्ट म्हणून काम करत असलेले सन्मा. डॉ. अनिरुद्ध पाटील यांनी विद्यार्थी व पालक यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच डॉ. सुभाष म्हात्रे ( PhD), डॉक्टर आशीर्वाद मोकल, सत्यविजय ठाकूर यांनी विविध क्षेत्रातील करिअर संदर्भात तसेच ITI शिक्षक श्री.मनोज पाटील सर यांनी आयटीआय मध्ये करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे निवेदन श्री सुहास म्हात्रे, स्मिता लोंढे व स्वतः आयोजक दत्ता म्हात्रे यांनी केले .अशा प्रकारचा कार्यक्रम संपूर्ण वाशी विभागामध्ये प्रथमच झाल्याने आयोजकांचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.