

फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) –
काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या अतिरेकी आक्रमणानंतर भारताने दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरानंतर युद्धविरामाचे औपचारिक निवेदन झाले असले, तरी पाकिस्तानकडून छुप्या स्वरूपातील कुरापती आणि कारवाया अजूनही सुरुच आहेत. अशा परिस्थितीत भारताचा विजय व्हावा आणि पृथ्वीवरील एकमेव सनातन राष्ट्र असलेल्या भारताचे रक्षण व्हावे, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने फर्मागुडी, फोंडा, गोवा येथील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या पावन भूमीत २० ते २२ मे २०२५ या कालावधीत त्रिदिनी ‘शतचंडी यज्ञा’चे आयोजन करण्यात आले आहे. या यज्ञाचा प्रारंभ विधिपूर्वक करण्यात आला आहे.
या यज्ञाचे यजमानपद दांपत्य सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, तसेच सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या भूषवत आहेत.
यज्ञाच्या प्रारंभी श्रीगणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध यांसह वास्तूमंडल देवतांचे आवाहन, पूजन व अन्य धार्मिक विधीने करण्यात आले. त्यानंतर प्रधान देवतांचे आवाहन आणि पूजन झाल्यानंतर पंचाक्षरी होमाची दिव्य प्रक्रिया संपन्न झाली. हा शतचंडी यज्ञ शिवागम विद्यानिधी आगमाचार्य श्री. अरुणकुमार गुरुमूर्ती आणि गुरुमूर्ती शिवाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असून यज्ञविधी करताना पुरोहितांनी यज्ञाचे महत्व स्पष्ट करत सांगितले की, सर्व देवतांचे तेज, शक्ती आणि कृपा ही चंडीरूपातच एकत्रित प्रकट होते. म्हणूनच श्रीचंडीदेवीला ‘महिषासुरमर्दिनी’ म्हणून ओळखले जाते. अष्टदशभुज महालक्ष्मी हेही तिचे एक रूप असून, ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवतांच्या शक्तीचे साक्षात् मूर्तिमंत स्वरूप म्हणजे श्री चंडीदेवी. त्यामुळे चंडी होमामध्ये समस्त पूजांचे परिपूर्णत्व सामावलेले आहे.
श्री. अभय वर्तक,
प्रवक्ते, सनातन संस्था.




Be First to Comment