
रोहा : समीर बामुगडे
वरसे, ता. 14 मे 2025: वरसे ग्रुप ग्रामपंचायतच्या आज, 14 मे 2025 रोजी झालेल्या ग्रामसभेत प्रशासनाच्या हलगर्जीपणाने आणि नाकर्तेपणाने निवी गावावर घोर अन्याय झाला आहे. ग्रामपंचायत विभाजनाच्या चर्चेत वरसे आणि भुवनेश्वर गावांचा समावेश करून निवी, ठाकूरवाडी आणि आदिवासीवाडी या गावांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले. यामुळे संपूर्ण निवी गाव संतप्त झाले असून, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि प्रशासनावर तीव्र टीका करत ग्रामस्थांनी तातडीने माफी मागण्याची मागणी केली आहे. इतकेच नव्हे, तर जोपर्यंत माफी मिळत नाही, तोपर्यंत कोणतीही ग्रामसभा घेण्यास परवानगी न देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
निवी गावातील ग्रामस्थांनी प्रशासनाच्या या भेदभावपूर्ण वागणुकीला “निवी गावाचा सुनियोजित अपमान” असे संबोधले आहे. “ग्रामपंचायत विभाजनासारख्या गंभीर विषयात आमच्या गावाचे नाव का वगळले? हा आमच्या हक्कांचा आणि विकासाचा खून आहे. सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी आपली जबाबदारी झटकून गावाच्या भवितव्याशी खेळण्याचा हा घृणास्पद प्रयत्न आहे,” असे एका संतप्त ग्रामस्थाने सांगितले. विशेष म्हणजे, काही स्वार्थी ग्रामपंचायत सदस्यांनी भुवनेश्वर गावाला स्वतंत्र करण्याचा प्रस्ताव मांडला, पण त्यातही निवी गावाचा उल्लेख टाळून त्यांनी आपली संकुचित मानसिकता उघड केली. याबाबतही ग्रामस्थांनी या सदस्यांना माफी मागण्याचा इशारा दिला आहे.
“आम्ही गावाच्या विकासासाठी ग्रामसभेत सहभागी होतो, पण जर आमच्या गावाला अशा पद्धतीने डावलले जाणार असेल, तर हे प्रशासन आणि ग्रामपंचायत यांचे षड्यंत्र आहे. आम्ही हा अपमान सहन करणार नाही,” असे ग्रामस्थांनी ठणकावले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामपंचायत विभाजनाचा मुद्दा आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाला “निवी गावाच्या भावनांचा आणि हक्कांचा आदर करा, अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जा,” असा स्पष्ट इशारा दिला आहे. प्रशासनाने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही, पण निवी गावाच्या या आक्रमक भूमिकेमुळे आगामी ग्रामसभा आणि विभाजन प्रक्रिया यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.





Be First to Comment