15 ऑगस्ट पर्यंत वेळ देतो
अन्यथा आमच्या पद्धतीने लॉक डाऊन उठवू
वंचित आघाडीचा इशारा
सिटी बेल लाईव्ह/मुंबई.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील एसटी, बेस्ट आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे त्रास सहन करावा लागत असून राज्य सरकारने तात्काळ लॉकडाऊन उठवावा. यामागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने बुधवारी (ता.12) रोजी राज्यातील एसटीच्या डेपो आगारांपुढे ‘डफली बजावो’ आंदोलन करण्यात आले. दरम्यान राज्य सरकारने येत्या 15 ऑगस्टपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी आपल्यापद्धतीने लॉकडाऊन उठवणार असल्याचा इशारा ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.
राज्यभरातील एसटीचे आगार, बस स्थानक, डेपोपुढे बुधवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘डफली बजावो’ आंदोलन करण्यात आले.
यामध्ये मुंबई उपनगरातील एकूण 24 ठिकाणी आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह एसटी कर्मचाऱ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. एसटीच्या मुख्यालयातील मुंबई सेंट्रल आगारात सुद्धा एसटी कर्मचारी आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी सुमारे 1 तास नारेबाजी आणि डफली बजावो आंदोलन केले.
दरम्यान, राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आंदोलनाला जोर दिसून आला असून, वंचितचे अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर येथील आंदोलनाला हजेरी लावली होती. यानंतर राज्य सरकारने 15 ऑगस्टपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा त्यांनतर वंचित बहुजन आघाडी आपली ठोस भूमिका स्पष्ट करणार असल्याचे ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.






Be First to Comment