Press "Enter" to skip to content

गोमंतकाच्या पावन भूमीत घुमणार सनातन राष्ट्राचा शंखनाद

वैश्विक असंतुलनाच्या पार्श्वभूमीवर भारताची दिशादर्शक
सनातन मूल्यपरंपरा

समस्त मानवजातीच्या परम कल्याणासाठी, तसेच रामराज्याच्या स्थापनेसाठी कार्यरत सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव सोहळा आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ या स्वरूपात गोवा येथे साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी संकलित केलेला लेख.

प्रस्तावना
आज जग एका निर्णायक वळणावर उभे आहे. युक्रेन-रशिया, इस्रायल-गाझा, चीन-तैवान युद्ध आणि भारत-पाकिस्तानमधील वाढते तणाव हे तिसऱ्या महायुद्धाच्या सावल्या अधिक गडद करत आहेत. प्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमस याने २०२५ च्या सुमारास एका विनाशकारी जागतिक युद्धाचा उल्लेख त्याच्या भविष्यवाण्यांमध्ये केला आहे. काश्मीरमध्ये घडत असलेले हल्ले, सीमेवरील कुरापती, आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे जाळे यांमुळे देशावर महायुद्धाची वीज कधी कोसळेल, हे सांगता येत नाही. त्यातच भर म्हणून जगभर भूकंप, वादळे, ज्वालामुखी, हवामानात सातत्याने होणारे बदल यांसारख्या नैसर्गिक आपत्तीही मानवाचे जगणे कठीण करत आहेत. सर्व प्रकारे दाटून आलेली ही अस्थिरता कधी संपणार, कधी शांतपणे आयुष्य जगता येणार, याची प्रत्येकाला प्रतीक्षा आहे.

जग भारताकडे आशेने पहात आहे

नॉस्ट्रॅडॅमसने स्पष्ट सांगितले आहे, “तिसऱ्या महायुद्धानंतर जगाचा नेतृत्वभार एक आध्यात्मिक राष्ट्र घेईल.” त्यांच्यासह इतर अनेक संत, द्रष्टे, भविष्यवेत्ता, राजकीय विश्लेषक आणि आधुनिक विचारवंतांनीही विविध प्रकारे तिसऱ्या महायुद्धाची शक्यता व्यक्त केली आहे. विविध देशांमध्ये चालू असलेला संघर्ष हे या महायुद्धाची नांदी आहेत. त्याचा वणवा कधी पेटेल, हे कोणीच सांगू शकणार नाही. असे असले, तरी सगळे देश भारताकडे आशेने पहात आहेत, हे मात्र नक्की. युक्रेन आणि रशिया युद्धातही भारताने मध्यस्थी करावी, असे अनेकांनी सुचवले होते. भारताला स्वतःला आतंकवाद, नक्षलवाद, भ्रष्टाचार, अनैतिकता यांसारख्या अनेक समस्यांनी ग्रासलेले असतांना भारत अन्य देशांना आधारासाठी, मध्यस्थीसाठी पर्याय का वाटत आहे, याचे उत्तर आहे भारताला लाभलेले धार्मिक अधिष्ठान !

सनातन मूल्येच मानवतेचे रक्षण करू शकतात

युद्ध, तणाव आणि नैतिक अधःपतनाच्या गर्तेत सापडलेल्या जगासाठी सनातन धर्मच शाश्वत उपाय आहे. जेव्हा मोठमोठे देश भारताने आशेने पहात आहेत, तेव्हाच भारतानेही धर्माधिष्ठित राष्ट्रनिर्मितीची दिशा स्वीकारली, तर तो संपूर्ण मानवतेसाठी नवचैतन्याचा दीपस्तंभ ठरेल. ती परिवर्तनाची वेळ आता आली आहे, असेच संकेत दिसू लागले आहेत. अनेक धर्मनिरपेक्ष म्हणवणारी राष्ट्रे कोलमडत असतांना भारत उभारी घेत आहे. केवळ विकास नाही, तर त्याला नितीमूल्यांची जोड दिल्यामुळेच देशाचा जागतिक स्तरावर दबदबा निर्माण होत आहे, हे तर उघडच आहे. आज आपण सगळेच पहातो की, स्वतःचा धर्म उघडपणे सांगणारे, नवरात्रीत उपवास करणारे, महाकुंभमेळ्यात अमृतस्नान करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतराराष्ट्रीय स्तरावरील प्रभावशाली नेते आहेत. आपली सनातन नितीमूल्ये, संस्कृती आणि धर्माच्या आधारेच भारत नव्या युगाचा दीपस्तंभ बनेल, असे अनेक द्रष्ट्या संतांनी सांगितले आहे. जगभर अस्थिरता पसरलेली असताना सनातन मूल्येच मानवतेचे रक्षण करू शकतात. धर्मनिरपेक्षतेची काँग्रेसने लादलेली बेडी तोडून जेव्हा हे राष्ट्र सनातन धर्मी हिंदु राष्ट्र म्हणून पुन्हा उदयास येईल, तेव्हा भारत खऱ्या अर्थाने विश्वगुरुपदावर विराजमान होईल.

‘सनातन राष्ट्र’ – वर्तमान जागतिक अस्थिरतेवरील एकमेव वैदिक उत्तर !

तो दिवसही आता दूर नाही, कारण गोमंतकाच्या पावन भूमीत घुमणार आहे सनातन राष्ट्राचा शंखनाद ! सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे धर्माच्या आधारे देशाचे पुनरुत्थान करण्यासाठी गेल्या ३ दशकांहून अधिक काळ कार्यरत आहेत. धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे, हे त्यांचे वचन आहे. त्यासाठी धर्माचरणी प्रजा निर्माण होण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो साधक साधना करत आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संकल्पिलेल्या सनातन राष्ट्राचा शंखनाद अनेक संत-महंत आणि नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे. १७ ते १९ मे २०२५ या काळात गोव्यातील फर्मागुडी, फोंडा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ संपन्न होत आहे. हा महोत्सव म्हणजे एका नवीन युगाचा, एका धर्माधारित राष्ट्रनिर्मितीचा आणि एका आध्यात्मिक क्रांतीचा शंखनाद आहे. या महोत्सवात शिक्षण, अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र, न्यायव्यवस्था या सर्व बाबींमध्ये धर्माधारित दृष्टिकोन कसा असावा, यावर मार्गदर्शन मिळेल.

जगाच्या उंबरठ्यावर आज जे संकट उभं आहे, त्याला उत्तर नवी युद्धं नाहीत, तर नवी मूल्यं आहेत. आपल्या ऋषीमुनींनी ‘सर्वे भवन्तु सुखिनः…’ अशी प्रार्थना केली. हेच ब्रीद घेऊन उभे राहिलेले सनातन राष्ट्र हे जगाला शांती, न्याय, संतुलन आणि सत्वगुण देऊ शकणारे उत्तर आहे. भारतच धर्मबळावर उभे राहून संकटग्रस्त जगाला दिशा देईल.

संकलक : श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था
(संपर्क : ७७७५८५८३८७)

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.