Press "Enter" to skip to content

यश प्राप्तीसाठी प्रामाणिक व सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा – डॉ. देवानंद शिंदे

चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स  अँडसायन्स स्वायत्त कॉलेज महाविद्यालयातील पदवी आणि  पदव्युत्तर वर्षाच्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न

पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर आर्टस्कॉमर्स  अँडसायन्स स्वायत्त कॉलेज महाविद्यालयातील पदवी आणि  पदव्युत्तर वर्षाच्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा आज (दि. ०३) सीकेटी महाविद्यालयाच्या प्रांगणात समारंभपुर्वक मोठ्या उत्साहात पार पडला.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठचे माजी कुलगुरू व मुंबई विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू, डॉ. देवानंद शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

            या कार्यक्रमास जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर, वृषाली वाघमारे, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, भागूबाई चांगु काना ठाकूर विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या मा. डॉ. सानवी देशमुख  आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभली. या प्रसंगी प्राचार्य  प्रो. डॉ. एस. के. पाटील आणि  आर्टस् , कॉमर्स  अँडसायन्स विद्याशाखांचे प्रमुख आणि विविध  विभागांचे प्रमुख मंचावर मान्यवरांसोबतउपस्थित होते.

सोहळ्याचे प्रमुख पाहुणे डॉ. देवानंद शिंदे यांनी आपल्या भाषणात  नॅक मुल्यांकन प्राप्त केल्याबद्दल सीकेटी महाविद्यालयाचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना संबोधित करताना, भविष्यात यश मिळवायचे असेल तर प्रामाणिक राहिले पाहिजे व सकारात्मक दृष्टिकोन ठेवला  पाहिजे, असे सांगितले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना उद्देशुन सांगितले की कारणे सांगणारी माणसे मोठी होत नाहीत आणि मोठी माणसे कारणे देत नाहीत असे मार्गदर्शक तत्व सांगत तंत्रज्ञानाच्या जोरावर यश प्राप्त करता येते म्हणून भविष्यात संशोधन, तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे, असे नमूद केले.  जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था ही उत्कृष्ट शिक्षण संस्था या ठिकाणी प्रत्येकाला संधी मिळत असते, त्यामुळे हि संस्था मोठी झाली आहे, असे सांगत संस्थेचे कौतुक केले. 

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना उद्देशुन सांगितले की, प्रत्येक विद्यार्थ्यांने मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे व संघर्ष हाच यशाचा मार्ग आहे. जीवनात पदवी टप्पा महत्वाचा असतो ती तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या बळावर मिळवली आहे. हि पदवी घेऊन शांत राहू नका तर पुढच्या पदव्या पण प्राप्त करा असा मौलिक सल्ला देऊन  विद्यार्थ्यांना पुढच्या भविष्यातील वाटचालींसाठी शुभेच्छा दिल्या.

या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्यामध्ये पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि पदवी प्रमाणपत्र तसेच विद्यावाचस्पती प्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि पदवी प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या शानदार समारंभामध्ये एन.सी.सी. च्या पथकाने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. या सोहळ्याची सुरुवात सुरेल राज्य गीताने झाली. त्यानंतर  प्राचार्य मा. प्रो. डॉ. एस. के. पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये महाविद्यालयातील गौरवशाली परंपरांचा आढावा घेतला. तसेच प्रमुख पाहुण्यांची ओळख इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर. व्ही. येवले यांनी करून दिली. या सोहळ्यामध्ये सर्व पालक व गुणवंत विद्यार्थ्यांचे चांगु काना ठाकूर कॉलेजचे प्राचार्य  प्रो . डॉ. एस. के. पाटील यांनी कौतुक केले. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीक्षा नियंत्रक प्रो. डॉ. एस. आय. उन्हाळे,  विद्यार्थी परिषद व विद्यार्थी कल्याण कक्षाच्या अध्यक्षा डॉ. एम. ए. म्हात्रे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. डॉ. बी. डी. आघाव यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याचे आभार प्रदर्शन परीक्षा नियंत्रक प्रो. डॉ. एस. आय. उन्हाळे यांनी केले.  प्रा. डॉ. आर. व्ही. येवले , प्रा. ए. व्ही. पाटील आणि प्रा. डॉ. गीतिका तंवर यांनी कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन केले.    

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.