
बांगलादेशातील हिंदूंवर होणारे आक्रमण आणि चिन्मय कृष्णदास यांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने पेण येथे आंदोलन !
पेण – बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन करणार्या बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अन्याय्य अटक करण्यात आली आहे. ही अटक म्हणजे हिंदू अल्पसंख्याकांचे हक्क दडपण्याचा आणखी एक प्रकार आहे, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची विनाअट सुटका व्हावी आणि हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे, अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून ८ डिसेंबर या दिवशी पेण येथील शरद पवार भवन समोर, कोतवाल चौकात झालेल्या आंदोलनात करण्यात आली.
‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने घेण्यात आलेल्या या आंदोलनात इस्कॉन, विश्व हिंदु परिषद, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,गोरक्षक मंगल पाटील गोशाळा, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी आंदोलनात सहभागी झालेल्या हिंदूंनी हातात प्रबोधनपर फलक धरले होते आणि घोषणाही देण्यात आल्या. या वेळी केंद्र शासनाला देण्यात येणार्या निवेदनावर लोकांच्या स्वाक्षर्या घेण्यात आल्या.
आंदोलनात बोलताना हिंदू जनजागृती समितीचे श्री सुनील कदम म्हणाले, प्रलय काळात याच इस्कॉनने नागरिकांना अन्न मिळावं त्यासाठी मंदिरामध्ये जेवण दिले होते. आज त्याच इस्कॉनच्या मंदिरांवर आक्रमण केले जात आहेत. जगात कुठेही हिंदूंवर अन्याय-अत्याचार होत असेल तर त्याचा पाठीशी उभे राहणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे आपल्या भारतातील हिंदूंचे कर्तव्य आहे.
इस्कॉन च्या साधिका सौ. मीनाक्षी पाटील विषय मांडताना म्हणाल्या, बंगलादेश तेथील हिंदूंना जागृत करण्याचे कार्य केले म्हणून चिन्मय कृष्णदास प्रभूजी यांना अटक करण्यात आली. त्यांना वकील न मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आपल्या रक्षणासाठी आपण वेळीच संघटित होऊ या, अन्यथा भविष्यात एकत्र येणे अशक्य होईल.
बांगला देशातील हिंदूंवर होणाऱ्या आत्याचाराच्या विरोधात कारवाई करण्यासाठी हिंदूंनी संघटीत होऊन भारत सरकारवर दबाव निर्माण करूया असे गोरक्षक श्री मंगल पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अधिवक्ता श्री म्हात्रे आणि दिघाटी गावचे माजी सरपंच श्री रोहिदास शेडगे यांनीही आपले विचार मांडले.
बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवरील अन्याय भारतासाठी केवळ शेजारील प्रश्न नसून हिंदूंच्या अस्तित्वाचा, मानवाधिकार आणि धर्मस्वातंत्र्याचा संवेदनशील विषय आहे. हिंदूंवरील हे अत्याचार रोखले नाही, तर त्याचे लोण भारतात येण्यास वेळ लागणार नाही; म्हणून हिंदूंना भारत सरकारकडून कठोर भूमिका आणि निर्णायक पावले उचलण्याची अपेक्षाही हिंदूनी व्यक्त केली आहे.




Be First to Comment