जनतेच्या न्याय मागण्यांसाठी “भारत छोडो आंदोलन”
सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू )
करोनाच्या काळात निर्माण झालेली महागाई, बेरोजगारी, उपासमार या मुख्य मुद्द्यांना घेऊन बोकडविरा, कामगार भवन समोर सी आय टी यू , अखिल भारतीय किसान सभा,अखिल भारतीय जनवादी महीला संघटना व डि वाय एफ आय या संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
यावेळी कोरोना संकट असे पर्यंत माणशी १५ किलो रेशनवर मोफत धान्य द्यावे त्यात तांदूळ, गहू, डाळ, कडधान्य, खाद्यतेल,साखर मिळावी. आयकर लागू नसलेल्या कुटुंबाला दरमहा ७५००/-रु देण्यात यावेत. लॉक डाऊन काळातील वीज बिल माफ करावे, निसर्ग चक्रीवादळाने बाधीत ग्राहकांना जून , जुलै चे वीज बिल देखिल माफ करावे, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरचे चालू दराच्या निम्म्या किमतीत द्यावे., सर्व कामगारांचे आरोग्य सुस्थितीत रहाण्यासाठी फक्त ८तासांची कामाची वेळ निश्चित करावी, रीक्षा चालक-मालक, दुकाने व इतर अस्थापनात काम बंद मुळे रोजगार स्वयंरोजगार बंद झाला आहे. अशा नागरीकांना दरमहा १०हजार रु.अर्थसहाय्य द्यावे. निसर्ग चक्रीवादळाने बाधीत तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जनतेला सन्मानजनक मदत द्यावी, उरण तालुक्यातील जनतेसाठी कोविड-१९करीता सर्व सुविधांनी सुसज्ज असे रुग्णालय उभारावे व १००
खाटांचे मंजूर रुग्णालयाची निर्मिती करावी, सरकारी कंपन्यांची विक्री करु नये, प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन करावे, जुन्या व नव्या प्रकल्पात नोकरी उपलब्ध कराव्यात, जेएनपीटी एसईझेड मध्ये प्रकल्पग्रस्त व स्थानिकांना रोजगार द्यावा, उरण पनवेल सह जिल्ह्यातील खेडोपाडी एसटीची बस सेवा पुर्ववत सुरु करावी. अशा स्थानीक, राज्य व केंद्र स्तरीय मागण्या केल्या आहेत.
निदर्शनात कॉम्रेड भूषण पाटील, कॉम्रेड मधुसूदन म्हात्रे, महिला नेत्या हेमलता पाटील,युवा नेते दिनेश म्हात्रे, राकेश म्हात्रे व कॉम्रेड संजय ठाकूर यांनी संबोधित केले. केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांवर कडाडून टीका केली. भारताचे पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच कोकण आयुक्त व जिल्हाधिकारी रायगड यांना निवेदन पाठविण्यासाठी निवासी नायब तहसीलदार श्री.संदिप खोमणे यांचे कडे निवेदने सादर केली. यावेळी संजय ठाकूर, रामचंद्र म्हात्रे,रजनी पाटील, चंद्रकांत कोळी व संतोष ठाकूर उपस्थित होते.








Be First to Comment