भंडारी समाजाला शासनाने मदतीचा हात द्यावा : ताडीमाडी उत्पादक व व्यावसायिकांची मागणी
सिटी बेल लाइव्ह / रायगड / अमूलकुमार जैन #
कोरोना जागतिक महामारी व निसर्ग चक्रीवादळाने विस्थापीत झालेल्या कोकणातील ताडीमाडी उत्पादक व व्यावसायिक तथा भंडारी समाजालाशासनाने मदतीचा हात देण्याची मागणी या समाजाच्यावतीने करण्यात आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविण्यात आलेल्या एका निवेदनातून ती करण्यात आली आहे.संपूर्ण देशासह राज्यात मार्च महिन्यापासून कोरोना महामारीने थैमान घातले असतांना तीन जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने कोकणपट्टीतील नारळ सुपारीच्या बागाच उद्धवस्त करुन टाकल्या त्यामुळे भंडारी समाजाच्या प्रमुख्याने असलेल्या ताडीमाडी उत्पादन व विक्री व्यवसायावर गदा आली आहे.
मार्च ते जून या ऐन व्यवसायाच्या तेजीच्या काळातच हा व्यवसाय बंद पडला.निसर्ग वाद्ळात वर्षाच्या बोलीने माडी काढण्यासाठी घेतलेली बहुतांशी माडाची झाडे जमिनदोस्त झाली तर जी तग धरुन आहेत त्यावर चढून माडी काढणे शक्य नाही.झाडाच्या पैशांसह ताडीमाडी विक्री परवान्यांचे शुल्क आधीच विक्री परवानाधारकांनी शासन दरबारी भरले आहेत.परंतु कोरोनामुळे विक्रीवर बंदी आली.शासनाने राज्यातील दारु विक्री सुरु केली.पण ताडीमाडी विक्रीला परवानगी देण्यास उशिर केला.आजही ताडीमाडीवर असलेली जिल्हा व तालुका वाहतुक बंदी उठवण्यात आलेली नाही.परिणामी संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून असलेल्या आरोग्यदायी ताडीमाडी उत्पादन व विक्रीवर बंधने येऊन कोकणातील भंडारी समाजाचा हा मुख्य व्यवसायच बंद पडून गोरगरीब भंडारी समाज त्यात भरडला गेला आहे, तो बेरोजगार बनला आहे. त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याकडे लक्ष देऊन त्यास शासनाने मदतीचा हात देण्याची मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे.
सदर निवेदन परवानाधारक सुभाष पाटील,महेश पाटील,किरण सतविडकर,विनोद पुलेकर,गणेश खेऊर,दिपक खोत,दिलिप चिंदरकर ,नरेश कासेकर आदींनी दिले आहे.






Be First to Comment