जेएनपीटी टाऊनशिपमध्ये सुरक्षारक्षक म्हणून मिळाल्या नोकऱ्या
जेएनपीटी विश्वस्त कॉम्रेड भुषण पाटील व सुरक्षारक्षकांचे नेते प्रमोद ठाकूर यांचे विशेष प्रयत्न
सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
सध्या देशभरात कोरोनाच्या महामारीमुळे रोजगार जात आहेत. परंतु प्रामाणिक नेत्यांच्या गेल्या अनेक महिन्यांच्या प्रयत्नानंतर उरण तालुक्यातील १२ कुटुंबातील युवकांना जेएनपीटी टाऊनशिपमध्ये सुरक्षारक्षक म्हणून नोकऱ्या मिळाल्या आहेत. सदर युवक रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळातर्फे जेएनपीटी टाउनशिपमध्ये नोकरीत रुजू झाले आहेत.
न्हावा शेवा बंदर कामगार संघटना अंतर्गततर्फे मुंबई उच्च न्यायालयातून (याचिका क्रमांक- WP No. ८२५१/२०१३) सध्या काम करीत असलेल्या ८५ लोकांच्या नोकऱ्या शाबूत ठेवाव्यात. असा आदेश आला आहे. परंतु येथे १८ सुरक्षारक्षक कमी होते. ते भरण्यासाठी जेएनपीटीचे विश्वस्त कॉम्रेड भुषण पाटील व सुरक्षारक्षकांचे नेते प्रमोद ठाकूर (१९८४ च्या आंदोलनातील गोळीबारात जखमी) हे अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करीत होते. त्याला यश आले असून, गेल्यावर्षी ज्या उरण तालुक्यातील युवकांच्या लेखी, मौखिक व शारीरिक परीक्षा झाल्या होत्या. त्यापैकी १२ युवक जेएनपीटी टाउनशिपमध्ये सुरक्षारक्षक म्हणून रुजू झाले आहेत.
त्यांना याकरिता कोणताही खर्च आलेला नाही. नेते जर प्रामाणिक असतील. तर अशाप्रकारे कुठलाही खर्च न करता देखील नोकऱ्या मिळू शकतात. हेच यामधून सिद्ध झाले आहे. या युवकांची नावे व गाव यादी खाली देत आहोत. भविष्यात अशीच मोठी भरती होणार आहे. या भरतीकरिता महाराष्ट्र शासनाने प्राधान्याचे आदेश व निकष ठरविलेले आहेत. या लेखी आदेशाप्रमाणे प्रथम प्राधान्य प्रकल्पग्रस्तांना असेल, द्वितीय प्राधान्य त्या तालुक्यातील स्थानिक युवकांना असेल, तालुक्यात उपलब्ध नसल्यास लगतच्या तालुक्यातील युवकांना व त्यानंतर जिल्ह्यातील युवकांना असा अग्रक्रम आहे. शासनाच्या या आदेशामुळे प्रकल्पग्रस्त व स्थानिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे. या नोकरीकरिता आता शासनाने १८,९०५ रुपये वेतन ठरविलेले आहे. याशिवाय बोनस, पीएफ, वारसाला नोकरी, वैद्यकीय सुविधा इत्यादी लाभ देण्यात येतात. याशिवाय नोकरीकरिता शासनाने जानेवारी ते जून २०२० या ६ महिन्याकरिता २४५६८ रुपये प्रति महिना इतके किमान वेतन ठरविलेले असून ०१ ऑगस्टपासून पुन्हा वाढ होणार आहे. परंतु काही स्थानिक तरुण ही नोकरी करण्यास लाजतात. तरी भविष्यात या संधीचा फायदा जास्तीत जास्त प्रकल्पग्रस्त व स्थानिक युवकांनी घ्यावा. असे आवाहन सुरक्षारक्षक नेते प्रमोद ठाकूर यांनी केले आहे.
या तरुणांना न्याय मिळविण्यासाठी उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील व सरचिटणीस संतोष पवार हे नियमित सहकार्य करीत आहेत.
सुरक्षारक्षक म्हणून नोकरीवर रुजू झालेल्या युवकांची यादी खालीलप्रमाणे,१) रवींद्र रमण घरत- सावरखार, २) समाधान चांगु कणेकर – दादरपाडा, ३) विपुल आनंद मोहिते -जांभूळपाडा, ४) मनीष रमेश देवरे – भोवरा,उरण, ५) अनिरुद्ध भास्कर पाटील – वेश्वि, ६) चैतन्य हरिश्चंद्र कोळी – हनुमान कोळीवाडा, ७) समीर शांताराम उतेकर – म्हतवली,नागाव,८) एकांत भालचंद्र कोळी – मुळेखंड, ९) निखिल विलास कोळी – हनुमान कोळीवाडा, १०) चेतन अनंत कडू – वेश्वि, ११) रवींद्र बळीराम म्हात्रे – पाले,१२) दीपक दत्तात्रेय पाटील – करंजा असे कामावर हजर झालेले युवक आहेत.






Be First to Comment