Press "Enter" to skip to content

‘तिरंगा एकता सायकल रॅली’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रोटरी क्लब ऑफ पनवेल इलिट यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये ‘तिरंगा एकता सायकल रॅली’

सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆

देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रोटरी क्लब ऑफ पनवेल इलिट यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये झालेल्या ‘तिरंगा एकता सायकल रॅली’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्वातंत्र्यदिनी हि रॅली पनवेल तालुका व शहर भाजप मध्यवर्ती कार्यालय येथून सुरु झाली. या रॅलीचे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी रोटरी क्लब ऑफ पनवेल इलिटचे पदाधिकारी, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शहराध्यक्ष रोहित जगताप, उदित नाईक, चिन्मय समेळ, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रॅलीचे संयोजक श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांचे चिरंजीव अमोघ आणि अपूर्व हे सुद्धा या तिरंगा रॅलीत सायकलस्वार म्हणून सहभागी झाले होते.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिश साम्राज्यातून स्वातंत्र्य मिळाले. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली. आणि त्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि देशभक्तीने प्रेरित होऊन साजरा करीत आहोत. याच क्षणाला अजरामर करण्यासाठी आणि स्वातंत्र्य लढयाची आठवण करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सुरुवात केली.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या आयोजनामध्ये स्वातंत्र्य लढयाची भावना व त्याग अनुभवता येत आहे. देशातील सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याबरोबरच भारत घडविण्याचा संकल्प आणि या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारद्वारा देशाच्या व तिरंग्याच्या सन्मानासाठी ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात आले आणि अभियानात संपूर्ण देशाने सहभाग घेतला. त्याच अनुषंगाने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रोटरी क्लब ऑफ पनवेल इलिट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तिरंगा एकता सायकल रॅली’ पार पडली. हि सायकल रॅली ५ किमी अंतराची होती. तसेच यावेळी रॅली प्रारंभ ठिकाणी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम पार पडला.

या रॅलीत सहभागी झालेल्या प्रत्येक सायकलस्वारास मोफत टीशर्ट देण्यात आले होते. संततधार झालेल्या पावसातही या रॅलीत शेकडो सायकस्वारांनी तसेच नागरिकांनी सहभाग घेऊन या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.