शिहू बेणसे विभागात अतिवृष्टीने विदधुत खांब कोसळले : पुन्हा विजबत्ती झाली गुल, नागरिक चिंतेत

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
निसर्ग चक्री वादळानंतर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. मात्र पेण तालुक्यातील शिहू बेणसे परिसरासह अन्य भागात विजेचा लपंडाव काही केल्या थांबत नसल्याचे दिसते. अशातच निसर्ग चक्रीवादळाची पुनरावृत्ती होत सलग दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली. यामध्ये शिहू बेणसे विभागातील अनेक ठिकाणचे विदधुत खांब कोसळले, व विदधुत पुरवठा खंडित झाला.
विजवीतरण विभागाने तात्काळ याकडे लक्ष देऊन विदधुत खांब उभे करावेत व वीजपुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे. शिहू बेणसे विभागात अनेक कोरोना रुग्ण गृहविलगीकरणात असून वीजपुरवठा खंडित झाल्यावर या रुग्णांची दमझाक होत आहे, ऑक्सिजन पातळी कमी झाल्यावर त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. अशातच रात्री मच्छर रक्त पितायेत याबरोबरच पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिक त्रस्त झालेत. विजेचा लपंडाव थांबवा, वीजपुरवठा सुरळीत करा, या मागणीने जोर धरला आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून कधी दिवसा तर कधी रात्री विजबत्ती गुल होते. कोरोनाच्या पाश्वभूमीवर सध्या सारेच घरात आहेत. विजेच्या लपंडावाने नागरिक , बालबच्चे वृद्ध सारेच बेजार झाले आहेत. खंडित झालेला वीजपुरवठा केव्हा पूर्ववत होईल याचा अंदाज येत नसल्याने नागरिक सतत चिंतेत असतात. विजवीतरण अधिकारी व कर्मचारी मात्र मंद गतीने पाऊले टाकताना दिसत आहेत. विजवीतरण कर्मचाऱ्यांची कार्य तत्परता दिसून येत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. वादळाने उध्वस्त झालेली विधुत यंत्रणा उभी करण्यासाठी अनेक ठिकाणी तरुण विजवीतरण च्या मदतीला सरसावले होते. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली होती. आज देखील विजवीतरण च्या मदतीला तरुण व ग्रामस्त तयार आहेत, त्यामुळे लवकरात लवकर विजवीतरण कर्मचाऱ्यांनी आपली यंत्रणा कार्यान्वित करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शिहू बेणसे विभागातील जनतेला वर्षातील बाराही महिने विजसमस्येला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र राज्य विद्धुत विज वितरण मर्यादित कंपनी अंतर्गत शिहू बेणसे विभागात अनेक गावे व आदिवासींवाड्यापाड्याना विद्युत पुरवठा केला जातो. मात्र आजमितीस सातत्याने विजेचा लपंडाव तर कधी पाच पाच दिवस विजबत्ती गुल होताना दिसते. दरम्यान विद्धुत देयके मात्र आवाक्याच्या बाहेर येत असल्याने सर्वसामान्य गोरगरीब जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.
आज घडीला अतिवृष्टीचे निमित्त असले तरी ही वीज समस्या वर्षांनुवर्षे सतावत आहे. सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने ऐन पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वीजपुरवठा खंडित होताच बँकांचे व्यवहार ठप्प होत आहेत, नेटवर्क सेवा बंद पडत आहे. इंटरनेट सुविधेशी संबंधित सर्व शासकीय निमशासकीय कामे बंद होत आहेत. याठिकाणी कधी सलग तीन चार दिवस तसेच अनेकदा दहा दिवसही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांतून वीजवितरण च्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. जागरूक नागरिक वीजवितरण सातत्याने वीज समस्येवर आवाज उठवितात. मात्र काही केल्या या परिस्तितीत कोणत्याही प्रकारची समाधानकारक सुधारणा होत नसल्याने महिला वर्गातून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. दैनंदिन वीजपुरवठा खंडित राहून देखील येथील सबंधित अधिकारी व कर्मचारी नेमके करतात काय? असा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.
येथील सततची विजसमस्या सर्वानाच डोकेदुखी ठरत आहे. सध्या पावसाळा सुरू असून आता तर वीज समस्या अधिकच त्रासदायक ठरत आहे. शिहू बेणसे विभागात आदिवासीवाड्यापाड्यांचा समावेष असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती विस्तारलेली आहे. अशातच सातत्याने विजपुरवठा खंडीत होत असल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत सर्वत्रच गवत वाढले असून सर्प,विंचू व किटकांची भिती असल्याने अंधारात घराबाहेर बाहेर पडणे नागरीकांना धोक्याचे झाले आहे. तसेच डास व मच्छरांच्या उपद्रवाने नागरीकांच्या आरोग्य देखील धोक्यात येत आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर व्यवसाईक व व्यापारी वर्गाचे देखील नुकसान होत आहे. विजपुरवठा सुरळीत असो अथवा नसो विजबिल मात्र न चुकता येत असून ते वेळेत भरण्याची सक्ती केली जाते. विजबिल भरण्यास विलंब झाल्यास विजपुरवठा खंडीत करण्याच्या वेगवान प्रक्रीयेला येथील नागरीकांना सातत्याने सामोरे जावे लागते. दरम्यान विजवीतरण अधिकारी व कर्मचारी यांनी या विभागाची विजसमस्या कायम संपविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी व जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.






Be First to Comment