Press "Enter" to skip to content

श्रावण महिन्यात भाज्यांचे भाव कडाडले

सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊन काळापासून जास्त मागणी असलेल्या भाज्यांना आता श्रावण महिन्यात आणखी मागणी वाढली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरांत २० ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, घाऊक बाजारात भाज्यांचे दर स्थिर असताना वाहतूक खर्च वाढल्याचे कारण देत किरकोळ विक्रेत्यांनी नफेखोरी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
लॉकडाऊन काळात सुरुवातीला वाहतूकसंबंधीचे अनेक प्रश्न उद्भवल्याने भाज्यांची आवक काही अंशी घटली होती. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात भाज्यांचे दर कडाडले होते. मात्र आता लॉकडाऊनला शिथिलता आली असून शहरात होणारी भाज्यांची आवक स्थिर आहे. असे असतानाही गेल्या दोन दिवसांपासून किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वाढले आहेत. मंगळवारपासून श्रावण महिना सुरू झाल्याने अनेकांनी मासांहार सोडून शाकाहार अवलंबला आहे. त्यामुळे भाजी बाजारात ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. मुख्य बाजारपेठेत भाज्यांचा पुरवठा स्थिर असला तरी किरकोळ विक्रेत्यांचा वाहतुकीचा खर्च वाढल्याने भाज्यांचे दर वाढल्याचे विक्रेते सांगतात. गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत भाज्यांचे दर हे २० ते ३० टक्कय़ांनी वाढल्याचे दिसून आले आहे.
किरकोळ बाजारात आठवडाभरापूर्वी ४० रुपये किलो असलेली भेंडी, फ्लॉवर, टोमॅटो आणि वांगी यांचे दर ६० रुपये किलोवर गेले आहेत. तर ५० ते ५५ रुपये असलेली गवार, फरसबी, शिमला मिरची यांचे दर ६० ते ८० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. कोबी १५ रूपयांवरून २५ ते ३० रूपयांपर्यंत गेली असून वाटाणा शंभरीला पोहोचला आहे. ऐन श्रावणात मागणी वाढलेली असताना अशा प्रकारे भाववाढ झाल्यास मध्यमवर्गीयांचे आर्थिक गणित कोलमडल्याची भीती व्यक्त होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.