Press "Enter" to skip to content

आक्षी येथील मच्छिमारांना तहसीलदारांनी आणलं रस्त्यावर

खासदार राजन विचारे यांच्या बंगल्यासमोर असणाऱ्या समुद्रावर येण्या जाण्यासाठी रस्ता मोकळा रहावा यासाठी सर्वसामान्यावर कारवाई ; महेश गण


सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

अलिबाग तालुक्यातील आक्षी ग्रामपंचायत हद्दीतील समुद्र किनारी येण्या जाण्यासाठीचा रस्ता मोकळा रहावा यासाठी आक्षी येथील मच्छिमार यांचे मच्छिमारी साहित्य ठेवण्यासाठी पंचायत दरबारी नोंद असलेली जागा आहे. त्या बांधकामावर तहसीलदार यांनी कारवाई करून सर्वसामान्य मच्छिमारांस रस्त्यावर आणले असल्याचा आरोप पीडित मच्छिमार महेश बाळाराम गण यांनी केला आहे.

महेश गण यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की ,खासदार राजन बाबुराव विचारे यांची जागा आक्षी येथे समुद्रापासून काही मीटर अंतरावर आहे .ह्या जागेत त्यांनी बंगल्याचे बांधकाम केले आहे.या जागेत जाण्यासाठी दोन गेट असून पाठीमागील गेट हा समुद्राकडे जाण्यासाठी आहे.मात्र या बंगल्यानजीक पूर्वी परंपरागत महेश गण यांचे मच्छिमारी करण्याचे साहित्य तसेच उन्हाळ्यात मासळी सुकविण्यासाठीची जागा आहे.

सदर या जागेला आक्षी ग्रामपंचायत दरबारी नोंद असून त्याचा नंबर ६३७ असा आहे.सदर नोंद ही २००१ साली करण्यात आली आहे तेव्हा पासून आज पर्यंत महेश गण हे त्या जागेचा कर ग्रामपंचायत दरबारी जमा करीत आहे.तसेच गण यांच्या जागेच्या शेजारी गावातील इतर कोळी समाज बांधव यांची जागा सुद्धा आहे.

महेश गण यांनी पुढे सांगितले की मोठ्या मुस्किळने सदर जुन्या जोत्याचे नवीन बांधकाम करीत होते.मात्र धनदांडगे यांच्या आर्थिक आमिषाला बळी पडत अलिबाग तहसीलदार सचिन सैजाळ हे कायदा हातात घेऊन गोरगरीब जनतेला त्रास देत आहेत.खासदार विचारे यांच्या बंगल्याच्या समुद्राकडे जाणाऱ्या गेट जवळ माझी जागा असल्याने मला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे.त्या ठिकाणी इतर बांधकाम करणाऱ्यांना नोटीस न देता अथवा कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता केवळ गण यांना नोटीस देऊन बांधकाम अनधिकृत ठरविले आहे.तसेच तहसीलदार यांनी गण यांच्या जागेवर जेसीबी फिरविण्याचा आदेश दिला.

त्यावेळी गण परिवारातील काही सदस्य हे तहसीलदार यांना मिळण्यास गेले असता त्यांनी सांगितले की ,खासदार राजन विचारे यांचा फोन आला तर ही कारवाई थांबवली जाईल.याचा अर्थ काय निघत आहे असाही सवाल त्यांनी गण यांनी केला आहे.माझे बांधकाम तोडण्यासाठी तहसीलदार हे स्वतः न येता त्यांनी नायब तहसीलदार संदीप पानबंद,तलाठी नलिनी पाटील ,मंडळ अधिकारी आणि त्यांच्या मदतीला पोलीस कर्मचारी पाठवून माझ्या जोत्याचे बांधकाम जेसीबी ने तोडून टाकले आहे.

याबाबत मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,महसुलमंत्री बाळासाहेब सावंत, कोकण विभागीय आयुक्त, रायगड जिल्हा अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज करून दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सदर जागा ही महेश गण यांची असून त्याचा ग्रामपंचायत दरबारी नोंद आहे. त्याचप्रमाणे गण यांनी अतिक्रमण केले असेल तर त्याची मोजणी करणे गरजेचे होते .मात्र मोजणी न करता कारवाई केली गेली हे चुकीचे आहे. त्यांच्यावर झालेली कारवाई ही धनदांडगे यांच्या दबावाखाली केली असल्याची चर्चा उपस्थित नागरिकांमध्ये आहे, असे आक्षी उपसरपंच आनंद बुरांडे यांनी सांगितले.

अलिबाग तहसीलदार सचिन सैजाल यांनी सांगितले की आक्षी येथील महेश गण यांचे बांधकाम हे अनधिकृत असल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.माझ्यावर कोणाचाही दबाव नाही आहे.
खासदार राजन विचारे यांना या यासंदर्भात संपर्क साधला असता होऊ शकला नाही

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.