आंदोलने करण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घ्या

राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकारी अध्यक्ष शिवदास कांबळे यांच्या युवनेत्यांना कानपिचक्या
सिटी बेल लाइव्ह / पनवेल #
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वक्तव्याचा संधी म्हणून वापर करणाऱ्या भाजपाच्या युवा नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल कार्यकारी अध्यक्ष शिवदास कांबळे यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.
प्रतिक्रिया देत असतानाच सुरुवातीला त्यांनी,मी हिंदू आहे त्यामुळे राम मंदिर हे बांधलेच पाहिजे अशी रोखठोक भूमिका मांडली. परंतु राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार असेल तर त्यांना बांधू द्या! या पवार साहेबांच्या प्रतिक्रियेवर आंदोलन करणाऱ्या भाजपाच्या युवा नेत्यांना त्यांनी वस्तुस्थिती जाणून घ्या! असा सल्ला दिला आहे.
प्रतिउत्तर देताना कांबळे पुढे म्हणाले की, तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या दिग्गज नेत्यांसह अनेक राजकीय व्यक्तिमत्वांचे पवार साहेब हे कुलदैवत आहेत. राजकीय अनुभवाचा, कार्य कुशलतेचा, त्यांच्या वयाचा विचार करता जर कुणाचे चुकत असेल तर त्याला ते दाखवून देण्याचा त्यांना निश्चितच नैतिक अधिकार आहे. प्रकृती अस्वास्थ्य च्या अनेक तक्रारींना दूर ठेवत वयाच्या 84 व्या वर्षीसुद्धा ते आज covid योद्धा म्हणून झटत आहेत. सध्याच्या महामारी च्या काळात केवळ आणि केवळ कोरोना विषाणू चे उच्चाटन करणे हे एकमेव ध्येय डोळ्यापुढे ठेवून ते काम करत आहेत. आज कोरोना मुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांना बेड मिळत नाहीत. समूह संक्रमणामुळे उपचाराविना मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.अशा परिस्थितीत पवार साहेबांच्या वक्तव्यामुळे राईचा पर्वत करणाऱ्या भाजपा नेत्यांनी भूमिका, प्रतिक्रिया आणि पत्रकार परिषदेतील प्रश्नाला दिलेले उत्तर यातील फरक समजून घ्यावा.तो समजत नसल्यास राजकीय प्रगल्भता असणाऱ्या व्यक्तींकडून शिकून घ्यावा.
पुढे कांबळे यांनी युवानेत्यांना माहिती नसेल म्हणून आवर्जून सांगतो असे म्हणत किल्लारी चा भूकंप आणि पनवेल चा महापूर यावेळची आठवण सांगितली.ते म्हणाले जेव्हा जेव्हा देशावर,राज्यावर आपत्ती येते तेव्हा पवार साहेब सगळ्यात पहिले धाऊन येतात.किल्लारी मध्ये भूकंप आला आहे हे कळताच दहाव्या मिनिटाला गाडीत बसून पहाटे 4 ला तिथे पोहोचून ग्राउंड झिरो वरून आपत्ती व्यवस्थापन करणारे पवार साहेब होते.पुन्हा भूकंपाचा धोका असून तिथे न जाण्याचे सुरक्षा यंत्रणांचे संदेश असून सुद्धा जनमानस पहिले असे म्हणत ते काम करत होते.पनवेल मध्ये पुर आला त्यावेळेस पहाटे 6 वाजता येणारे पवार साहेब हे पहिले राजकीय व्यक्ती होते.सकाळी साडेसात वाजता अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तातडीने मदत पोहोचवणारे पवार साहेब होते.त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन ही त्यांची प्राथमिकता आहे,यापुढे सुद्धा राहील.
राहिला प्रश्न राम मंदिर उभारणीचा! तर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्याने ते आता उभे राहणारच यात जराही दुमत नाही.वास्तविक त्याच्या भूमिपूजनाचा सर्वप्रथम अधिकार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा.बाबरी मशीद पाडल्यानंतर भाजपा नेते पुढे येत नाही हे बघून जर बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे अशी खमकी भूमिका त्यांनी घेतली.त्यांच्या नंतर तो अधिकार लालकृष्ण अडवाणी यांचा आहे.जीवाची बाजी लावून रथयात्रा काढत सगळ्यांच्या मनात राममंदिर उभारले पाहिजे हा विचार त्यांनी रुजवला.
त्यामुळे सवंग लोकप्रियतेसाठी आंदोलन करण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घ्या अशा कानपिचक्या कांबळे यांनी युवा नेत्यांना लगावल्या आहेत.
चौकट
त्या पेक्षा मदत करा…
दहा लाख पत्रांचे प्रत्येकी 5 रू चे तिकीट,कार्ड, लिफाफे,छपाई यावर खर्च करण्यापेक्षा त्या पन्नास लाखांचे कोरोना निर्मूलनासाठी साहित्य द्या अशी कांबळे यांनी सूचना केली आहे.
तुम्ही तरी राम मंदिरात गेलात का?
महामारी च्या काळात देवळे बंद आहेत.तुम्ही सुद्धा पनवेल च्या राम मंदिरात जाऊ शकला नाहीत.मग उगाच घाई घाईने सोहळे कशासाठी.स्थिर स्थावर झाल्यावर मागावून सावकाश भव्य दिव्य सोहळा करता आला असता…






Be First to Comment