Press "Enter" to skip to content

कृषी विभागामार्फत खरीप हंगामाच्या सुरुवातीस बीज प्रक्रिया मोहीम

भातावर बीज प्रक्रिया करून,खरीप हंगामात पेरणी करण्याचे तालुका कृषी अधिकारी यांचे आवाहन

सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।

कृषी विभागामार्फत खरीप हंगामाच्या सुरुवातीस बीज प्रक्रिया मोहीम राबविण्यात येत असल्यामुळे,भात पीक उत्पादन वाढिमध्ये बीज प्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.जमिनीतून व बियाणे द्वारे पसरणारे रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी करून पिकांची वाढ होण्यासाठी बीज प्रक्रिया कमी खर्चाचे अत्यंत प्रभावी साधन आहे. या दृष्टीकोनातून खरीप हंगामामध्ये जास्तीत जास्त बिजप्रक्रिया,मोहीम मे महिन्या मध्ये राबविण्यात येणार असल्याचे आर. टी. नारनवर – तालुका कृषी अधिकारी, खालापूर यांनी प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले.

तालुक्यांमध्ये बीज प्रक्रिया मोहीम लोकसहभागातून विनाअनुदान तत्त्वावर राबविण्याचे नियोजित असून भात पिकामध्ये शेतकऱ्यांकडील स्वतःचे बियाणे वापराचे प्रमाण जास्त आहे,अशा बियाण्यावर जमिनीतून व बियाणे द्वारे होणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक संरक्षणावरील खर्चामुळे पिकाचे उत्पादन खर्चात वाढ होते व पर्यायाने उत्पादन घटते. त्याकरीता बीज प्रक्रिया मोहिमे अंतर्गत अशा शेतकऱ्यांना स्वतःकडील किंवा घरगुती वापरात येणाऱ्या बियाण्यास बीजप्रक्रिया आपण करु शकतो.

भात बियाण्यास बीजप्रक्रिया तीन प्रकारे केली जाते १) मिठाच्या पाण्याची बीज प्रक्रिया – या बीजप्रक्रिया मध्ये १० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मीठ विरघळून घ्यावे व त्यामध्ये भात बियाणे ओतावे व चांगले ढवळून घ्यावे नंतर द्रावण स्थिर होऊन द्यावे पोकळ व रोगाने हलके झालेले तरंगणारे बियाणे अलगद वरचेवर काढून घ्यावे तसेच तळाशी राहिलेले वजनदार व निरोगी बियाणे बाहेर काढून ते दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन सावलीत चोवीस तास वाळवावे व त्यानंतर रोग प्रतिबंधक उपाय म्हणून बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.
२) बुरशीनाशकाच्या बीजप्रक्रियेमुळे बियाण्यात राहणाऱ्या व तसेच उगवल्यानंतर पिकास अपायकारक असणाऱ्या बुरशीचा नायनाट करण्यासाठी बीजप्रक्रिया करतात, यामध्ये थायरम, कॅप्टन, कार्बनडिझम, यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक २.५ ग्रॅम या प्रमाणात १ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे.
३)जिवाणू खताची बीजप्रक्रिया – बियाणे रुजल्या पासून पिकाच्या पुढील वाढीसाठी आवश्यक असलेले नत्र व स्फुरद सहज उपलब्ध व्हावे म्हणून जिवाणू खताची बीजप्रक्रिया केली जाते यामध्ये १) पी एस बी (स्फुरद विरघळणारे जिवाणू) हे जिवाणू जमिनीतील स्फुरद विरघळणारे पिकास उपलब्ध करून देतात, याचे वापराचे प्रमाण 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे.
२) ऑझटोबॅक्टर नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू हे जिवाणू हवेतील नत्र शोषून घेऊन जमिनीत स्थिर करून पिकास उपलब्ध करून देतात वापराचे प्रमाण 200 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे.
वरील प्रमाणे खरीप हंगामात सर्व शेतकऱ्यांनी भात बियाण्यास अवश्य प्रक्रिया करावी. खरीप हंगाम व इतर माहितीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय खालापूर, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन तालुका कृषि अधिकारी, खालापूर यांचे मार्फत करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.