सिटी बेल लाइव्ह । उरण । घनःश्याम कडू ।
महामुंबई सेझ प्रकल्प उभारण्यासाठी 15 वर्षापूर्वी उरण, पेण, पनवेल तालुक्यातील 45 गावांतील शेतकर्यांच्या जमिनी परत करण्याच्या मागणीसाठी सेझग्रस्त शेतकर्यांचा 5 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
एसईझेड कंपनीने सन 2005 मध्ये उरण, पेण, पनवेल तालुक्यातील 45 गावातील शेतकर्यांच्या जमिनी
मिळकती शासनमार्फत संपादित केल्या आहेत. परंतु त्या संपादन करण्यात आलेल्या 10 हजार हेक्टर जमिनीवर 15 वर्षानंतरही महामुंबई प्रकल्प उभारु शकले नाहीत. महामुंबई विशेष आर्थिक क्षेत्र रायगड जिल्ह्यातील पेण, पनवेल आणि उरण या तीन तालुक्यातील 45 गावातील संपादनाखाली जमिनींचा एक जमीन घोटाळा आहे. बेकायदेशीर संमती निवाडे घोषित करुन जमिनीच्या सातबाराच्या उतार्यावर मे. मुंबई विशेष आर्थिक क्षेत्र लि. यांच्या नावाची कब्जेदार सदरी नोंद करण्यात आली आहे. या बेकायदेशीररित्या केलेल्या नोंदी रद्द करुन मूळ शेतकर्यांच्या नावे नोंदी पूर्ववत न झाल्याने व त्या जमीन मिळकती परत मागण्याकरिता 5 मार्च रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा व एक दिवसीय उपोषण करण्यात येणार आहे.
त्याबाबत जिल्हाधिकार्यांना 16 फेब्रुवारी 2021 रोजी निवेदन दिले असल्याची माहिती प्रकल्पग्रस्त शेतकरी सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष अरुण पाटील, उपाध्यक्ष अॅड. दत्तात्रेय नवाळे यांनी दिली.
45 गावे एकत्रया मोर्चाच्या तयारीसाठी पेण तालुक्यातील शिर्की येथे नुकतीच बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर उरण तालुक्यातील चिरनेर व तालुक्यातील ठिकठिकाणी बैठका सुरु आहेत. या मोर्चाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात होणार आहे. या मोर्चात पेण, पनवेल आणि उरण या तीन तालुक्यातील 45 गावांतील सेझग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती अॅड. दत्तात्रेय नवाळे यांनी दिली.








Be First to Comment