सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
सरनौबत नेताजी पालकर यांच्या जन्मगावी चौक येथे उंबरखिंड लढाईचा ३६० वा विजयी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रुप ग्राम पंचायत चौक व तुपगाव यांनी ग्राम पंचायतीच्या प्रांगणात मशाल रॅलीचे स्वागत केले.
सरनौबत नेताजी पालकर यांचे जन्मगाव चौक आहे.दरवर्षी ग्राम पंचायत प्रांगणात उभारलेल्या नेताजी पालकर यांच्या अर्धपुतळा जवळ सजावट करून ग्राम पंचायत हा विजयी दिन कार्यक्रम आयोजित करते.नेताजी पालकर सिनियर ग्रुप यांच्यावतीने नेताजी पालकर यांचे जन्मस्थान ते उंबरखिंड अशी मशाल रॅली काढण्यात येते.यावर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीवर ही रॅली रद्द करण्यात आली. त्यामुळे नेताजी पालकर यांचे जन्मस्थान पासून चौक बाजारपेठ मधून ही रॅली मोठ्या उत्साहात ग्राम पंचायत च्या प्रांगणात गेली.
चौकचे ग्राम विकास अधिकारी एस. पी.जाधव व तुपगावचे सचीन कुराडे यांनी या मशाल रॅलीचे स्वागत केले.जन्मस्थान येथे जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, माजी उपसभापती श्याम साळवी,सिनियर ग्रुप चे अध्यक्ष संजय कोंडीलकर, उपाध्यक्ष सुरेश घाग,जेष्ठ नागरिक कृष्णा चंबावडे,माजी सरपंच सौ. कविता कोंडीलकर,मंडळ निरीक्षक नितीन परदेशी,तलाठी अमोल बोराटे यांनी पूजन करून पुष्पहार अर्पण करून मशाल प्रज्वलीत करून रॅलीला सुरुवात केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या फौजेसह शाईस्तखान याचा प्रमुख सरदार कारतलब खान व त्याचे मुघलसैन्य यांच्याबरोबर चावणी (छावणी)उंबरखिंड येथे आंबा नदीच्या काठावर व चिंचोळ्या वाटेत केलेल्या लढाईत कारतलंब याने शरणागती पत्करली.२ फेब्रुवारी १६६० रोजी ही लढाई झाली. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज हे या लढाईत होते.त्यामुळे या रणसंग्रामाला मराठ्यांच्या इतिहासात अनन्य साधारण महत्व आहे.पुन्हा याभागात दगाफटका होऊ नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी विश्वासू सेनापती नेताजी पालकर यांना या ठिकाणी ठेवले.या लढाईत नेताजी पालकर यांचे युद्धकौशल्य मोठे होते.नेताजी पालकर यांना प्रति शिवाजी असेही म्हणतात.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महसूल विभाग,दोन्ही ग्राम पंचायत, नेताजी पालकर सिनियर ग्रुप,चौक व परिसरातील शिवप्रेमी मेहनत घेतली.








Be First to Comment