मोबईलला चरे पडू नयेत म्हणून स्क्रेच गार्ड मग डोक्याच्या सुरक्षेसाठी हेल्मेट का नाही ? : शशिकांत तिसरे
सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
‘आपण साधा मोबाईल घेतला तरी त्यावर चरे पडू नयेत म्हणून स्क्रच गार्ड लावतो. मात्र दुचाकी वाहन चालवताना आपल डोक वाचविण्यासाठी आपण हेल्मेट वापरत नाही. या साध्याश्या हलगर्जीपणामुळे प्रसंगी जीव गमवावा लागतो. हल्ली अल्पवयीन शाळकरी मुले सर्रास मोटरसायकल चालवतात. त्यांना पालकांचा पाठिंबा असतो. या प्रकारामुळे प्रसंगी एखाद्या अल्पवयीन मुलाच्या जीवावर सुध्दा बेतू शकते. याबाबतीत पालकांनी मुलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. असे मौलिक मार्गदर्शन मोटर वाहन निरिक्षक शशिकांत तिरसे यांनी केले.
प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल, समर्थ मोटर ट्रेनिंग स्कुल कर्जत आणि कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने 32 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल मध्ये आयोजित करण्यात आले होते. मोटर वाहन गजानन ठोंबरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून समारंभाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी कोंकण ज्ञानपीठ संस्थेचे खजिनदार झुलकरनैन डाभिया, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य विजय मांडे, माजी नगराध्यक्ष शरद लाड, वाहन निरीक्षक शशिकांत तिरसे, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, पोलीस निरीक्षक अरुण भोर, उप पोलिस निरीक्षक राजेंद्र मांडे, निलेश मराठे आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. मोहन काळे आणि निलेश मराठे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. महाविद्यालयीन अँटी रॅगिंग समितीचे सदस्य उप पोलिस निरीक्षक राजेंद्र मांडे यांना प्रजासत्ताक दिन पोलिस पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सन्मान पत्र देऊन गजानन ठोंबरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना मांडे यांनी ‘ मला पदक मिळविण्यासाठी मला 36 वर्ष मेहनत घ्यावी लागली. मात्र आपण आपले ध्येय गाठण्यासाठी मेहनत घेऊन प्रामाणिकपणे काम केल्यास निश्चित यश मिळते. आपापल्या क्षेत्रात आपण उंच शिखर गाठण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले पाहिजे.’ असे सूचित केले.

शशिकांत तिरसे यांनी दृकश्रावच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम समजावून सांगितले. तसेच पालक आपल्या मुलांना पाठीशी घालतात मात्र त्यामुळे त्यांचे किती नुकसान होते? हे सत्य घटना कथन करून सांगितले. त्यांनतर विजय मांडे ‘ विद्यार्थ्यांनी आत्ताच रस्त्यावर वाहन चालवताना नियमाने वाहन चालविले पाहिजे तरच भविष्यात त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. अधिकाऱ्यांबरोबरच पदाधिकाऱ्यांनी सुध्दा नियम समजावून सांगणे गरजेचे आहे. त्यांनी कोणत्याही अधिकाऱ्याला चुकीच्या गोष्टीसाठी फोन करू नये.असे स्पष्ट पणे सांगितले. पोलीस निरीक्षक अरुण भोर यांनीही मनोगत व्यक्त केले.
गजानन ठोंबरे यांनी, ‘ कोरोना महामारी मध्ये जितकी माणसे मृत्युमुखी पडली त्यापेक्षा जास्त माणसे रस्ते अपघातात दर वर्षी मयत होतात. त्यासाठी ठोस उपाय योजना करून कायद्याची अंमबजावणी काटेकोरपणे केल्यास अनेक अपघात टळू शकतील.’ असे स्पष्ट करून वाहतूक नियमांचे प्रत्येकाने पालन केल्यास साऱ्या समस्या सुटतील.’ अशी आशावाद व्यक्त केला. सूत्रसंचालन प्रा. अमोल बोराडे यांनी तर आभार प्रदर्शन विकास फिरके यांनी केले.
प्रशांत देशमुख, प्रा. प्रीतम जुवाटकर, प्रा. अनिकेत इंदुलकर, रेवती देशपांडे, महेश म्हात्रे, अर्जुन गोरखा, आदींसह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment