नवी मुंबई, दि.९ जानेवारी – नवी मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकांपूर्वीच येथील राजकीय वातावरण दिवसेंदिवस गंभीर होत आहे. भाजपच्या नगरसेवकांविरोधात पोलिस बळाचा विनाकारण वापर करण्यात येत आहे. नवी मुंबईत राजकीय वातावरण गढूळ करण्याचा काही पक्षांचा प्रयत्न असल्याचे चित्र आहे. पण पोलिसांनी महाविकास आघाडी सरकारच्या दबावाखाली काम करू नये, अन्यथा भाजप आक्रमक भूमिका घेईल असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज दिला.
दरेकर यांनी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांची आज भेट घेतली. त्यांच्याशी सध्याच्या राजकीय परिस्थितीसंदर्भात सविस्तर चर्चा केली. त्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, नवी मुंबईत भाजप नगरसेवकांमध्ये पोलिसी दहशत निर्माण केली जात आहे. पोलिस बळाचा वापर करून भाजपमधील नगरसेवकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कोणतेही कारण नसताना नगरसेवकांसंदर्भातील वेगवेगळ्या प्रकारच्या जुन्या कारवाई उकरुन काढायचे प्रकार सुरु आहेत. तसेच त्यांच्यावर पोलिसी दबाव आणून त्यांच्याविरुध्द कारवाई करण्याची भीती दाखविण्याचे प्रकार महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सध्या सुरु आहेत. भाजपमधील नगरेसवकांना विविध अमिष दाखवून त्यांना शिवसेनेत प्रवेश करण्याचे प्रयत्नही सुरु आहेत. शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर तुमच्याविरुध्दच्या सर्व गोष्टी आम्ही दूर करू अशी प्रलोभन दाखवून व सापळे रचून साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर सध्या केला जात असल्याचा आरोप दरेकर यांनी केला.
शहरात निवडणुकीपूर्वीच अनेक गोष्टी घडत आहेत. त्यामुळे नवी मुंबईमधील राजकीय वातावरण गढूळ झाले आहे. नगरसेवक व नागरिकांमध्ये भय निर्माण होऊ नये ही पोलिसांची जबाबदारी आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी पावले उचलावीत असे स्पष्ट करतानाच पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये व सरकारच्या दबावाखाली काम करू नये. पोलिसांनी अशा प्रकारच्या भूमिका घेतल्याचे आमच्या निदर्शनास आल्यास किंवा त्यांसंदर्भात काही पुरावे मिळाल्यास भाजप आक्रमक भूमिका घेईल असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी
नवी मुंबई पोलिस आयुक्तांची घेतली भेट
More from रायगडMore posts in रायगड »






Be First to Comment