
पेण, ता. १६ (वार्ताहर) : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या १९ दिवसांपासून उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आपला मोर्चा मुंबईकडे वळवला असून आता ते १८ सप्टेंबर रोजी खोपोली येथील ताकई येथे येत आहेत.त्या अनुषंगाने आज पेण येथे समाज बांधवांकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले.
मुंबईकडे येत असताना मनोज जरागे पाटील यांची दि. १८ रोजी रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे वस्ती होणार असल्याने पेण तालुका मराठा समाज त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे.समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या जरांगे पाटील यांना आपला जाहिर पाठिंबा देण्यासाठी समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने त्याठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन पेण तालुकाध्यक्ष पी.टी.शिंदे यांनी केले आहे.सदर बैठकीत तालुकाध्यक्ष पी.टी.शिंदे, माजी शहर अध्यक्ष प्रविण बैकर, सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे, बाळगंगा धरण संघर्ष समिती अध्यक्ष अविनाश पाटील, सचिन पवार, दशरथ येरणकर, मनोज पवार, सुभाष टेंबे यादिंसह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Be First to Comment