
पेण, ता. ५ (वार्ताहर) : राज्यातील शिक्षण क्षेत्राचा दर्जा दिवसेंदिवस कमकुवत होत चालला असतानाच शासन शिक्षकांना इतर कामांमध्ये गुंतवत असल्याने अनेक शाळांचा दर्जा यामुळे खालावत आहे परिणामी शालेय विद्यार्थ्यांचे यात फार मोठे नुकसान होत चालले असल्याने शासनाने शिक्षकांना शिक्षणा व्यतिरिक्त इतर कामांमध्ये गुंतवू नये अशी मागणी वंचितचे पेण तालुकाध्यक्ष सुनील धामणकर यांनी केली आहे.
राज्यात सध्या सुरू असलेली निवडणुकी कामे, जनगणना, सर्वेक्षण, विविध शासकीय योजना, कागदपत्रे पडताळणी, महसूल व इतर प्रशासकीय कामे शाळेतील शिक्षकांना लादण्यात येत असल्याने त्यांच्यावर प्रशासकीय कामांमुळे अधिकचा ताण येत आहे.त्यामुळे या अतिरिक्त कामांमुळे विद्यार्थ्यांवर शैक्षणिक दृष्ट्या परिणाम होत चालला असून विद्यार्थ्यांचे यामुळे नियमित अध्यापन गुणवत्ता पूर्ण शिक्षण तसेच अभ्यासक्रम पूर्ण करणे या सर्व शैक्षणिक गोष्टींवर तसेच शिक्षण व्यवस्थेवर याचा परिणाम जाणवत असून शिक्षण खात्याचा यामुळे अक्षरशः खेळखंडोबा झाला आहे. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असल्याने शासनाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याची गंभीर दखल घेऊन शिक्षकांना या अतिरिक्त कामाच्या तणावातून मुक्त करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे पेण तालुकाध्यक्ष सुनील धामणकर यांनी निवेदनाद्वारे केली असून लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणमंत्री दादा भुसे यांनाही याबाबतचे निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.




Be First to Comment