
पेण शहराच्या समस्यांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी येताना घेऊन यावे – नंदा म्हात्रे
पेण, ता. २४ (वार्ताहर) : पेण पालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ २६ रोजी पेण मध्ये येत आहेत मात्र येताना शहराच्या समस्यांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी घेऊन यावे कारण तीन वेळा पेण मध्ये येऊन अर्बन बँकेच्या ठेवीदारांना तात्काळ न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी ठेवली होती त्याचेही काय झाले असा सवाल काँग्रेस पक्ष नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नंदा म्हात्रे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
एकीकडे गेल्या दहा वर्षात सत्ताधारी पक्षाने पेण शहराचा विकासाला नाही तर शहर भकास करण्यावर भर दिला असून स्वतःच्या कुटुंबाचा विकास करण्यासाठी त्यांना सत्ता हवी आहे.शहरातील सर्व कामे टक्केवारीसाठी केली जात असल्याचा घणाघात सुद्धा त्यांनी या पत्रकार परिषदेत केला आहे.तर शहराचा २०१९ ते २०३९ चा जुना आराखडा मंत्रालयीन आगीत जळून खाक झाल्याची माहिती माहिती अधिकाराखाली मिळाली आहे.यामध्ये शहराची अनेक कामे रखडलेली असून वाढत्या लोकसंख्येनुसार शुद्ध पाणीपुरवठा, घरकुल योजनेत गोरगरिबांना वंचित ठेवणे, भाजी मंडई मध्ये अनेक अवैध धंदे, विक्रम मिनीडोअर रिक्षा आरक्षित जागा प्रलंबित प्रश्न, एटी पाटील चौक उध्वस्त करणे, शहरात लगत उड्डाणपूल होणे गरजेचे असताना मात्र बंदिस्त पूल करणे यासह अनेक समस्या निर्माण असतांना माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी संकल्प पत्रात कामे राहिली आहेत ती पुर्ण करण्याचा संकल्प मांडला आहे मग दहा वर्ष काय केले हा आमचा सवाल आहे.खरतर अर्बन बँकेच्यामुळे सत्तांतर झाले आणि आमदार रवीशेठ पाटील यांना सत्ता मिळाली परंतु पेणच्या जनतेने आता ठरविले असून काँग्रेस हा पर्यायी आहे. त्यामुळे जनता सुज्ञ आहे त्यामुळे या निवडणुकीत सत्तांतर अटळ असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
या पत्रकार परिषदेला कॉग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा रायगड प्रभारी राणी अगरवाल, विधानसभा निरीक्षक मनोज कांबळे, प्रदेश चिटणीस श्रुती म्हात्रे, ओबीसी कोकण विभाग शंभू म्हात्रे, तालुका अध्यक्ष अशोक मोकल, राष्ट्रवादी शरद पवार गट तालुका अध्यक्ष प्रकाश मोकल, माजी सरपंच बळीराम भोईर, पर्यावरण अजित पाटील, राजीव पाटील आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.



Be First to Comment