Press "Enter" to skip to content

“देता की जाता” आंदोलनातून घुमला केंद्र सरकार विरोधात आवाज

अजूनही सांगतो नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील साहेबांचे नाव द्या तुमचा झेंडा खांद्यावर घेऊन तुमचा प्रचार करीन
– भाई राजेंद्र पाटील यांचे केंद्र सरकारला खणखणीत आव्हान

पनवेल / प्रतिनिधी
        पनवेल येथील चिंचपाडा मधील श्री काळभैरव मंदिराच्या प्रांगणामध्ये समस्त दिनकर बाळू पाटील प्रेमी प्रकल्पग्रस्त बांधवांनी किर्तन भजन जागर करत केंद्र सरकारला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी बा पाटील साहेबांचे नाव देता? की सत्तेतून जाता? असा खणखणीत सवाल विचारला आहे. दि बा पाटील साहेब यांचे विमानतळाला नाव देण्यासाठीच्या संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या बोटचेप्या भूमिकेचा देखील यावेळी जाहीर निषेध करण्यात आला.शनिवार दिनांक १३ जानेवारी रोजी दि बा पाटील यांच्या ९८ व्या जयंती निमित्ताने भजन किर्तन जागर सोहळा आयोजित करण्यात आला होता.
        श्री काळभैरवाचे दर्शन घेऊन छोटेखानी दिंडी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये प्रांगणातील सभास्थानी अवतरली. यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांची उपस्थिती लाक्षणीय होती. ह भ प अरुण बुवा कारेकर यांनी त्यांच्या ओघवत्या शैली मध्ये प्रास्ताविक सादर केले. दी बा पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या सरकार ला एड विजय शिरढोणकर यांनी आपल्या मनोगतात चांगलेच झोडपून काढले.तरुण आणि उमद्या व्यक्तिमत्वाचे प्रेम पाटील यांनी जोषपूर्ण भाषणातून सरकारला इशारा दिला की जर
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी बा पाटील साहेबांचे नाव दिले नाही तर आम्ही प्रकल्पग्रस्त बांधव होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालू.
         मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाई राजेंद्र पाटील यांनी त्यांच्या आक्रमक शैलीतून भाषण करत  समस्त दी बा प्रेमींना सरकार विरोधात काम करण्याचे आवाहन केले.आदल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल सेतूच्या उद्घाटनादरम्यान थोर लोकनेते दिनकर बाळू पाटील यांच्या नावाचा साधा उल्लेखही न केल्याबद्दल त्यांनी अत्यंत दुःख व्यक्त केले. ते म्हणाले की राष्ट्र निर्मितीचे प्रकल्प ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनीवर उभे राहतात त्यांच्या भावनांच्याप्रति केंद्र सरकार जरा सुद्धा संवेदनशील नाही. अटल सेतूला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यापूर्वी महाराष्ट्रातील  एकही माजी नेता त्या लायकीचा नाही असे या केंद्र सरकारला का बरे वाटले असेल? देवेंद्र फडणवीस ज्या विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाचा उदो उदो करत असतात त्यांचे नाव का नाही दिले? ज्या सागरावर हा सेतू उभारला आहे त्या सागरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली नाव ज्या सेनापतींनी नेली त्या सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नाव का नाही दिले? हे फक्त शाहू,फुले,आंबेडकर यांचे नाव घेत बसणार पण त्यांच्या पैकी एकाचही नाव द्यावे असे का नाही वाटले?
      राजेंद्र पाटील पुढे म्हणाले की विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी जी संघर्ष समिती स्थापन झाली आहे तिचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक आंदोलने केली पण आता मात्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठका घेत असल्याचं फक्त नाटक करत आहेत.ते म्हणाले मी अजूनही सांगतो  नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील साहेबांचे नाव द्या ! मी जरी शेकाप चा असलो तरी तुमचा झेंडा खांद्यावर घेऊन तुमचा प्रचार करीन.
          भजन कीर्तन जागर सोहळ्याच्या सुरुवातीला गणेश पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर दि बा पाटील साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तमाम उपस्थितांनी विनम्र अभिवादन केले. त्यानंतर दी बा पाटील साहेबांच्या जयघोषणाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
        या सोहळ्याला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, एड विजय शिरढोनकर, पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद भगत, मो का मढवी गुरुजी, ह भ प विष्णू बुवा ओवळेकर, ह भ प आरुण बुवा कारेकर,प्रल्हाद महाराज,प्रेमनाथ बुवा पाटील,अनंत महाराज परदेशी,आंबो धनगर भोईर,विठाबाई अंबो भोईर आदींच्या सह विद्यार्थी,महिला,शिक्षक,ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

आक्रमकपणे भाषण करत असताना भाई राजेंद्र पाटील अचानक दि बा पाटील साहेबांच्या स्मृतींमध्ये रमले. तब्बल १८ वर्षे लोकनेते माजी खासदार दि बा पाटील यांच्यासोबत काम करणारे राजेंद्र पाटील हे पाटील साहेबांच्या मुशीत तयार झालेले आहेत.त्यांच्या स्मृती जगवताना त्यांनी विद्यावेतनाचा किस्सा सांगितला. विद्यार्थी दशेमध्ये त्यांना १२० रुपये विद्यावेतन मिळत असे. त्यातील फक्त १८ रू. पास साठी खर्च होत.त्यामुळे विद्यार्थ्यांकडे पुस्तके, जर्नल्स,ट्युशन, आहार भोजन, नोट्स यासाठी चांगले पैसे खिशामध्ये शिल्लक राहत असत. विद्या वेतन योजनेमुळे राजेंद्र पाटलांसारख्या अनेक प्रकल्पग्रस्त बांधवांच्या मुलांना शिक्षणात फायदा होत होता. त्यामुळे राजेंद्र पाटील यांनी दि बा पाटील यांना या संकल्पनेविषयी विचारले. त्यावेळेस पाटील साहेबांनी सांगितले की स्वातंत्र्यपूर्व काळात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ब्रिटिश सरकारने अनुदान,भत्ता दिले पाहिजे अशी आग्रही भूमिका महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडली होती व ब्रिटिश सरकारला तसे करावयास भाग पाडले होते. त्या संकल्पनेने प्रेरित होऊन दि बा पाटील साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याकडे ही मागणी लावून धरली आणि विद्यावेतन देण्यास भाग पाडले.

टिपण काढणार नसलास तर परत पुस्तकाला हात लावू नकोस…!


दि बा पाटील साहेबांच्या स्मृती जागविताना तमाम विद्यार्थी बांधवांना राजेंद्र पाटील यांनी एक स्वानुभव सांगितला. एकदा पाटील साहेबांनी भाई राजेंद्र पाटील यांना एक सुंदर पुस्तक वाचायला दिले. पुस्तक वाचून झाल्यानंतर राजेंद्र पाटील यांनी दि बा पाटील साहेबांना ते पुस्तक परत केले. त्यावर याची काही टिपणे काढून ठेवली आहेस का असे पाटील साहेबांनी भाई राजेंद्र पाटील यांना विचारले. त्यावर तशी काही टिपणे मी काढली नाहीत असे सहज उत्तर भाईंनी दिले. यावेळी प्रचंड रागावून दी बा पाटील साहेब म्हणाले की जर टिपणे काढणार नसलास तर परत पुस्तकाला हात लावू नकोस. यावर भाई राजेंद्र पाटील यांनी झाल्या चुकीबद्दल माफी मागितली आणि परत असे होणार नाही अशी ग्वाही दिली तेव्हा कुठे दि बा पाटील साहेबांचा राग निवळला.

चौकट

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.