फ्रेंच एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अँपच्या सर्वेक्षणाची विधानपरिषद सभापतींनी घेतली दखल
अँप बंद करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे दिले आदेश
सिटी बेल लाइव्ह । मुंबई ।
जागतिक महिला दिनाच्या दिवशी भारतीय महिलांच्या यशाच्या व पराक्रमाच्या गाथा प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याच वेळी ग्लिडनसारख्या विकृत एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अँपव्दारे एक सर्वेक्षण समोर करून भारतीय महिलांची बदनामीकारक अत्यंत निंदनीय माहिती
दिली. शिवसेना आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी ही गंभीर बाब विधानपरिषदेत औचित्याच्या मुद्दयाद्वारे उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले.
अखेर विधानपरिषद सभापतींनी याची गांभीर्याने दखल घेत महिला व बालविकास कल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांना या प्रकरणाकडे गांभीर्याने पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले आहेत.
सदर अँपवर बंदी आणण्याची मागणी आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी केली असता, त्यावर बोलताना विधानपरिषद सभापती म्हणाले की, अँप बंद करण्याचे अधिकार राज्याला असल्यास ते तातडीने बंद करावे. अँप बंद करण्याचे अधिकार राज्य सरकारला नसल्यास केंद्र सरकारने ज्या पद्धतीने चायना अँपवर बंदी आणली त्याप्रमाणे केंद्र सरकारला त्याबाबत माहिती द्यावी आणि त्याबाबत पाठपुरावा करण्यात यावा. तसेच टिव्ही 9 व बिझनेस स्टँडर्ड या वृत्त माध्यमांमध्ये काय वृत्त प्रसिद्ध झाले आहे त्याबाबत माहिती घेऊन पाठपुरावा करा असे निर्देश त्यांनी दिले.
ग्लिडनसारख्या विकृत एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अँपव्दारे एक सर्वेक्षण समोर करून महिलांची बदनामीकारक अत्यंत निंदनीय माहिती दिली असल्याची टीका शिवसेनेच्या आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी केली.
भारतीय महिलांना व्यभिचारी ठरवून त्यांची बदनामी करणाऱ्या फ्रेंच एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अँपचा शिवसेनेच्या आमदार डॉ मनिषा कायंदे यांनी जाहीर निषेध नोंदवला आहे. तसेच अशा अँपवर भारतात बंदी घालावी अशी मागणी डॉ मनीषा कायंदे यांनी केंद्र सरकार व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
“ग्लिडेनच्या दाव्यानुसार 60 कोटी भारतीय महिलांचा त्यांनी सर्वे केला. त्यांच्या निरिक्षणानुसार विवाहबाह्य संबंधात असलेल्या 48 टक्के महिला या मॉम म्हणजेच आई आहेत. अशा संबंधात असलेल्या 78 टक्के महिला
या उच्च शिक्षित तर आहेतच पण 74 टक्के महिला या नोकरी व्यवसायात उच्चपदस्थही आहेत. त्यामुळे कामासाठी बाहेर पडलेल्या महिलांच्या गरजा, त्यांच्या अपेक्षा वेगाने बदलताना दिसत असल्याचा खोटा दावा या अँपमध्ये करण्यात आला आहे. आजच्या 21 व्या शतकात स्त्रिया हे चूल आणि मूल सांभाळून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बाहेरील जगात आपली जबाबदारी कर्तव्यनिष्ठेने पार पाडत आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. अशात या अँपने खोटा सर्व्हे करून एकप्रकारे भारतीय महिलांची प्रतिमा मलिन करण्याचं पातक केलं आहे,” अशा शब्दांत डॉ. कायंदे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीय प्रसार माध्यमांनी याची बातमी प्रसिद्ध करून नेमकं काय साध्य केलं आहे. ती बातमी ही त्या अँपचा व्यवसाय वाढवण्यासाठी केली आहे का असा सवाल डॉ मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे. तसेच भारतीय प्रसार माध्यमांनी तरी भारतीय महिलांबाबत असे वृत्त प्रसिद्ध करताना शालीनता आणि किमान पत्रकारितेचि नीतिमूल्ये जपून वृत्ताची सत्यता पडताळून खात्री करणे आवश्यक होते अशी टीका कायंदे यांनी प्रसार माध्यमांवर केली.
जागतिक महिला दिनी असा महिलांचा अपमान व सरसकट बदनामी साठी झालेल्या सर्वेक्षणात काय सत्य व आधार आहे? या बातमीचा महिलांच्या मनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बातमीमुळे भारतीय महिलांचा स्वाभिमान दुखावलं आहे. त्यामुळे खोटे सर्वेक्षण करणाऱ्या या अँपच्या व्यवस्थापनाने तमाम भारतीय महिलांची जाहीर माफी मागावी अन्यथा भारतीय महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा कडक इशारा डॉ मनीषा कायंदे यांनी दिला आहे.







Be First to Comment